
सातारा : सातारा-लोणंद-शिरवळ हा महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. सातारा लोणंद मार्गावरील वाढे येथील वेण्णा पूल व आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाची कामे तातडीने सुरू करून येथील मार्ग रुंद करण्यात यावा, अशा तातडीच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संतोष रोकडे, सातारा प्रांत आशिष बारकुल, भूसंपादन उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, सातारा तहसीलदार समीर यादव, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव इत्यादी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले, सातारा-लोणंद-सुपे ते केडगाव महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या जबाबदारीने हे काम करणार असून सातारा लोणंद मागाँवरील वेण्णा पूल आरळे येथील कृष्णा पुलाच्या रुंदीकरणाची कामे तातडीने हाती घेतली जातील, रस्ते येथील अरुंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, बाहे वडूत शिवथर आरळे येथून बायपास काढावा. मार्गाचे काम करताना झाडे तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. झाडांचे पुनर्रोपण करावे. रुंदीकरण झाल्यावर वृक्षारोपणाकडे लक्ष देऊन त्याचे जिओ टॅगिंग करावे. झाडांचे संवर्धन केल्यानंतरच ठेकेदाराचे बिल काढले जावे ही कामे दर्जेदार व्हावीत येथे तडजोड होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना मंत्री शिवेंद्रराजे यांनी ठेकेदारांना दिल्या.
रायगाव फाटा व वाढे फाटा येथे सेवा रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होईल. रस्त्याच्या दुतर्फा समतल गटारे करण्यात यावी, नसरापूर येथे खड्ढे पडल्याने महामार्गाची दुरुस्ती करावी, कराड महामार्ग उड्डाणपुलाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण झाले पाहिजे, येथील स्ट्रीट लाईट तातडीने सुरू व्हाव्यात, अशा सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा कोल्हापूर महामार्गाच्या कामा संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात मुंबई येथे बैठक होणार आहे. या महामार्गावर सात ते आठ तास वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. साखर कारखान्याचे हंगाम सुरू होणार असल्याने महामार्गावर वाहतूक वाढणार आहे. वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. महामागांच्या सेवा रस्त्यांची सुद्धा तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.