shrikant shinde announces candidates
सांगली : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षनेत्यांच्या बैठका आणि दौरे वाढले आहेत. दिवाळीनंतर निवडणूक लागण्याची शक्यता असताना महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे. दरम्यान, जागावाटपावरुन महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणूकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये देखील जागावाटप हे महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. कारण महायुतीच्या अंतिम जागावाटपापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीने आपापला जागावाटप फॉर्मुला अद्याप जाहीर केलेला नाही. चर्चा सुरु असल्यामुळे कोणाला नक्की किती अन् कोणत्या जागा मिळणार हे स्पष्ट झालेले नाही. तरी देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवाराचे थेट नाव जाहीर करुन टाकले आहे. श्रीकांत शिंदे यांनी सांगलीतल्या खानापूर (विटा) मतदारसंघातील आटपाडीमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती. सुहास बाबर आयोजित दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने श्रीकांत शिंदेंनी उपस्थिती लावली. त्यांनी उपस्थितांशी संवाद देखील साधला. यावेळी सुहास बाबर यांच्या पाठिशी आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायचं आहे, असे विधान श्रीकांत शिंदे यांनी केले. त्यामुळे महायुतीकडून खानापूर (विटा) मतदारसंघातील महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर झाल्याची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये श्रीकांत शिंदे म्हणाले की, आटपाडीसारख्या ग्रामीण भागातही आपण एवढी मोठी दहीहंडी आयोजित केली आहे. मी सुहास बाबर यांना शुभेच्छा देतो. पुढच्या दोन महिन्यांत आपल्याला विजयाची दहीहंडी साजरी करायची आहे. आज प्रचाराची दहीहंडी फुटली आहे. आज आमची बैठकही झाली. दोन महिन्यांनंतर आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाची दहीहंडी फोडायची आहे. तेव्हा ८ थरांपेक्षा जास्त थरांची दहीहंडी आपल्याा उभी करायची आहे. सगळ्यात वर सुहास बाबर यांना चढायचं आहे. आपल्या सगळ्यांना त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहायचं आहे,” असे सूचक विधान श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.