
फोटो सौजन्य- pinterest
मंगळवारी दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला आहे. यावेळी ठाणेकरांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ दिल्याचे दिसून आले.
गणेशोत्सवाच्या काळात तलाव आणि जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने राबवलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन मोहिमेला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी पार पडलेल्या दीड दिवसांच्या विसर्जनादरम्यान तब्बल २० हजार ७०३ गणेशमूर्तीना निरोप देण्यात आला असून, या कालावधीत पालिकेच्या वतीने तब्बल १८ हजार ६०० किलो निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. या संपूर्ण निर्माल्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून सेंद्रिय खतनिर्मितीचे काम सुरू आहे. ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत यंदा निर्माल्य व्यवस्थापनाचे विकेंद्रीत नियोजन करण्यात आले आहे. विसर्जन घाट, कृत्रिम तलाव आणि मूर्ती संकलन केंद्रांवर भाविकांनी समर्पित केलेले निर्माल्य तातडीने संकलित करून ते शहरातील तीन प्रमुख प्रक्रिया केंद्रांकडे रवाना करण्यात आले.
हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्क आणि कौसा येथील मेकॅनिकल बायो-कंपोस्टिंग प्रकल्पांमध्ये शास्त्रीय पद्धतीने या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जात आहे. महापालिकेने केलेल्या आवाहनामुळे निर्माल्यामध्ये प्लास्टिक टाकण्याचे प्रमाण नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कमी केले आहे. संकलित झालेल्या एकूण १८ हजार ६०० किलो निर्माल्यात ३ टक्के प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण आढळून आले. हे अविघटनशील प्लास्टिक निर्माल्यापासून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेगळे केले असून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते थेट मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी केंद्रांकडे पाठवण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे वेळीच योग्य संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया करून शास्त्रोक्त पुनर्वापर केल्यामुळे ठाण्यातील तलाव, खाडी किनारे आणि इतर जलस्रोतांचे प्रदूषण रोखून जलप्रदूषणाला आळा घालण्यास प्रशासनाला मदत होत आहे. आगामी ५. ७ आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जनावेळीही भाविकांनी निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता पालिकेच्या निर्माल्य कलशातच अर्पण करून ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
बायोकंपोस्टिंग पद्धतीने निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या बायोकंपोस्टिंग खत प्रकल्पात तब्बल १८ हजार ६०० किलो निर्माल्य जमा करण्यात आले. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार असून निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)