मुंबई : ‘सरकारी जमिनींसह (Government Land) शेतीमध्ये फारसं काही पीकत नसले तर ती शेती 30 वर्षे भाड्याने घ्यायला राज्य सरकार (Maharashtra State Government) तयार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. तसेच नापीक असलेल्या भागातील शेतकऱ्यांची जमीन सौरऊर्जा प्रकल्पासाठी करार पद्धतीने भाड्याने घ्यायला तयार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
पाणी फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. नमो शेतकरी योजना सुरू केली. केंद्रासह राज्य सरकारदेखील शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये टाकणार आहे. विम्याचा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही. जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना शेततळे दिले आहे. सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील. शेतकऱ्यांना त्याबदल्यात मोबदला दिला जाईल’, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, एक एकरमागे वर्षाला 75 हजार रुपये देणार असल्याची घोषणा करत फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यात येणार आहे. जितके अॅग्रीकल्चर फीडर आहेत. हे सगळे सोलरवर चालवण्यात येणार आहेत. हे फीडर सोलरवर आणण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यात येणार हे काम यंदाच्या वर्षी सुरु करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
शेतकी मालकी तुमची, फक्त…
सरकारी जमिनीसह शेतीमध्ये फारसं काही पीकत नसले तर ती शेती 30 वर्षे भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार आहे. शेतीची मालकी तुमची असणार आहे. वर्षाला 75 हजार रुपये भाडं देण्यात येईल. इतकेच नव्हे तर दरवर्षी 2 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असेही त्यांनी सांगितले.