संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मार्ग बदलल्यामुळे उरळी कांचन ग्रामस्थ आक्रमक
उरळी कांचन : राज्यामध्ये सध्या आषाढी वारीचा उत्साह आहे. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांनी पुण्याचा कालच निरोप घेतला. आज पालख्या पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाल्या आहेत. मात्र संत तुकाराम महाराज यांची पालखी उरळी कांचनमध्ये अडवण्यात आली आहे. गावकऱ्यांनी ही पालखी अडवली. वर्षानूवर्षे असलेल्या पालखीच्या मार्गामध्ये थोडासा बदल करण्यात आला. यामुळे ग्रामस्थ चिडले असून पालखी अडवण्यात आली आहे.
उरुळी कांचनमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल झाली. मात्र पालखीचा नगारा अडवण्यात आलेला आहे. उरुळी कांचन गावामध्ये दरवर्षीच्या मार्गावरून पालखी घेऊन न गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी पालखी थांबवलेली आहे. विश्वस्त आणि उरुळीकांचनचे ग्रामस्थ यांच्यामध्ये वादंग झाला. दरम्यान घटनास्थळी पुणे अधीक्षक पंकज देशमुख दाखल झाले असून ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहे. पालखी लोणी काळभोरचा मुक्काम संपवून यवतच्या दिशेने मुक्कामी चालली आहे.
गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
संत तुकाराम महाराज यांची यवत येथून जाणारी पालखी ऊरळी कांचनमध्ये नेहमीच्या ठिकाणी थांबली नाही. दरवर्षीच्या मार्गात काही बदल करण्यात आला. मात्र हा निर्णय मान्य नसल्याचे म्हणत गावकऱ्यांनी पालखीचा नगारा अडवला आहे. तसेच गावकऱ्यांनी रस्ता रोको केला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस अधिक्षक आणि काही स्थानिक ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर पालखी पुढे काढण्यात आली. मात्र ग्रामस्थ अजूनही आंदोलन करत आहेत. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, त्यांच्याकडून गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.