
फोटो सौजन्य - Social Media
सातारा : जिल्ह्यातील सातारा, खटाव व माण तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला उरमोडी धरणाने भक्कम आधार दिला आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्या उरमोडी धरण जलाशयाचे ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाचा हा शासन निर्णय इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान करणारा ठरला आहे.
उरमोडी धरणामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे. विशेषत: पावसावर अवलंबून असलेल्या माण, खटाव तालुक्यातील शेतकर्यांना या धरणामुळे दिलासा मिळाला आहे. या धरणाच्या जलाशयाला ऐतिहासिक व स्थानिक महत्त्व असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे नावे देण्याची मागणी बर्याच वर्षांपासून शासनाकडे होत होती. उरमोडी धरण जलाशयाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नाव दिल्याने स्थानिक पातळीवर ऐतिहासिक परंपरेचा गौरव होणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. शिवाय, सातारा जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला नवे कोंदण मिळाल्याची भावना जनमाणसात निर्माण झाली आहे.
उरमोडी धरणाच्या उभारणीत स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. सातारा, खटाव व माण तालुक्यातील कोरडवाहू शेतीला भक्कम आधार मिळाला आहे. या धरणामुळे वर्षभर पाणी उपलब्ध झाल्याने पिकांची उत्पादकता आणि पीकपद्धतीत मोठे बदल झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीतही शेतकर्यांना स्थैर्य देणारा जलस्रोत म्हणून उरमोडी धरण महत्त्वाचे ठरले आहे. सिंचनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा जिलह्याच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व निर्माण केले. सहकार क्षेत्रात त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व सामान्यांच्या विकासाला गती दिली. सामाजिक कार्यातून त्यांनी शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकासात भरीव योगदान दिले.
स्थानिक पातळीवर लोकसंपर्क व विकासकामांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. त्यामुळे उरमोडी जलाशयाला त्यांचे नाव देणे हा स्थानिक लोकभावनेचा सन्मान मानला जात आहे. स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचाच वारसा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले हे चालवताना दिसत आहेत. त्यांच्या माध्यमातून उरमोडी धरण प्रकल्पच्या दोन्ही कालव्यांचे काम मार्गी लागले आहे. यां जलाशयाला स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे नाव दिल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.