
Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध
देवळी : सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा संताप शुक्रवारी पाहायला मिळाला. पंचनामे करण्यास होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी देवळी तालुका कृषी कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे समोर आल्यानंतर आंदोलनकर्त्यांचा रोष आणखी वाढला. यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार आणि नारळ अर्पण करून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
चालू खरीप हंगामात काही शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मात्र, तक्रारी दाखल करूनही पंचनाम्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
कृषी विभागाकडे सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या सुमारे ३०० तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. त्यापैकी आतापर्यंत केवळ ७० शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल २७० तक्रारींच्या अनुषंगाने पंचनामे अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्व पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसु आणि खरेदी-विक्री संघाचे सभापती अमोल कसणारे यांनी केले. अरुण लाहोरे, सुनील बासू, रवींद्र चौधरी, पवन महाजन, सुरेश वैद्य, हरीश ओझा यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची तातडीने पाहणी करून पंचनामे पूर्ण करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना विलंब न करता नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.