(Photo - X)
वर्धा, ब्युरो : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्याथ्यर्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात विविध शासकीय वसतिगृहे सुरू आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जिल्ह्यातील १० शासकीय वसतिगृहातील ९२५ जागा असून, आतापर्यंत केवळ ५९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर तब्बल ३२७ जागा रिक्त आहेत. वसतिगृहात विद्यार्थ्यांना निवास, भोजन व इतर आवश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला.
जिल्ह्यात मुलांसाठी ६ तर मुलींसाठी ४ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. वर्धा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात ७५ मंजूर जागांपैकी ५० विद्यार्थी वास्तव्यास आहे. महादेवपुरा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृहात ७५ जागांपैकी विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला. आर्वी येथील ५१ वसतिगृहातील सर्व ५१ जागा भरल्या आहेत. उमरी (मेघे) वसतिगृहात १०० पैकी ६४, पुलगाव मुलांच्या वसतिगृहात १०० पैकी ६९, पुलगाव मुलींच्या वसतिगृहात १०० पैकी ७५, देवळी वसतिगृहात १०० पैकी ६७, हिंगणघाट वसतिगृहात १०० पैकी ७० आणि नालवाडी मुलींच्या वसतिगृहात १०० पैकी ६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सर्वात कमी प्रवेश आष्टी येथील मुलींच्या वसतिगृहात नोंदविण्यात आला असून १०० मंजूर जागांपैकी केवळ ३६ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला.
समाजकल्याण विभागाच्या माहितीनुसार विविध आरक्षण प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना नियमानुसार वसतिगृहात प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविल्या जातात. मात्र, काही वसतिगृहांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आणि मुलभूत सुविधांच्या देखभालीबाबत विद्याथ्यांकडून तक्रारीही समोर आल्या.
२ शासकीय निवासी शाळांमध्ये ३७० विद्यार्थीः समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात २ शासकीय निवासी शाळाही कार्यरत आहेत. हैबतपूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत २०० पैकी १७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर उमरी (मेघे) येथील निवासी शाळेत २०० पैकी १९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. अशाप्रकारे दोन्ही निवासी शाळांमध्ये एकूण १०० मंजूर जागांपैकी ३७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सावंगी (मेघे) येथे सुमारे २५० क्षमतेचे नवीन शासकीय वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाने तयार केला. इमारत बांधकामाचा प्रस्ताव आणि खर्चाचा अंदाज वरिष्ठ स्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, मंजुरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन वसतिगृह उपलब्ध होणार आहे.






