
फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मुंबईतील प्रसिद्ध ‘मन्नत’ बंगल्याच्या नूतनीकरणाला अखेर सुप्रीम कोर्टाची मंजुरी मिळाली आहे. या नूतनीकरणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत, घरमालकांना कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या मालमत्तेत बदल करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. याचिकाकर्त्याने ‘मन्नत’ बंगल्याच्या विस्तारासाठी आवश्यक पर्यावरणीय मंजुरी आणि इतर वैधानिक नियमांचे पालन झाले नसल्याचा दावा केला होता. तसेच पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांसाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC) यांची मंजुरी बंधनकारक असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले होते.
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ‘मन्नत’ हे खासगी निवासस्थान असल्याचे सांगत, कायद्याचे पालन केल्यास त्याच्या नूतनीकरणावर कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच हे प्रकरण पुन्हा राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) पाठवण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली.
यापूर्वी NGT नेही ‘मन्नत’ बंगल्याच्या विस्तारासाठी देण्यात आलेल्या CRZ आणि पर्यावरणीय मंजुरीविरोधातील अपील नामंजूर केले होते. प्रकल्पासाठी आवश्यक सर्व परवानग्या नियमानुसार मिळाल्याचे लवादाने स्पष्ट केले होते. दरम्यान, गौरी खान यांनी ‘मन्नत’च्या सहा मजली अॅनेक्स इमारतीवर आणखी दोन मजले उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावामुळे पर्यावरणीय मंजुरीवरून वाद निर्माण झाला होता. मात्र, NGT आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानेही याचिका फेटाळल्याने आता ‘मन्नत’च्या विस्ताराचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे.
शाहरुख खानने खरेदी केली आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट! येथूनच सुरु झाला होता किंग खानचा प्रवास
दिल्ली येथे खरेदी केली वास्तू!
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने दिल्लीतील पंचशील पार्क येथील आपल्या बालपणाच्या आठवणींशी जोडलेली मालमत्ता पुन्हा खरेदी केली आहे. सुमारे ३७ कोटी रुपयांना त्याने इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला विकत घेतला असून, यापूर्वी तळमजला आणि पहिला मजला त्याच्या मालकीचा होता. त्यामुळे आता संपूर्ण इमारतीची मालकी शाहरुखकडे आली आहे. याच घरात त्याचे बालपण गेले होते आणि गौरी खानसोबत लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवसही त्याने येथेच घालवले होते. अनेक वर्षांनंतर हे घर पुन्हा मिळाल्याने शाहरुखने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.