शिवप्रेमींमध्ये ‘शिवराज अष्टक’ चित्रपटामुळे चर्चेत राहिलेले दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून दिग्दर्शक चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. आशयघन चित्रपटाच्या माध्यमातून आणि चित्रपटाच्या कथानकातून दिग्दर्शकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आपल्या उत्तमोत्तम चित्रपटांतून लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपली वेगळी छाप निश्चितच उमटवली आहे. ‘शिवराज अष्टक’ नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. नुकतीच त्यांनी एक खास पोस्ट सोशल माध्यमांवर शेअर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोमवारी (३१ मार्च २०२५) लखनऊ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय आस्थेने त्यांची चौकशी केली. तर आपल्या आगामी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे खास निमंत्रण दिग्पाल लांजेकर यांनी योगी आदित्यनाथ यांना दिले. या भेटीत इतिहास, कला, संस्कृती अशा विषयांवर दोघांमध्ये मनसोक्त गप्पा झाल्या. भेटीदरम्यान, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांसोबत अभिनेता अजय पूरकर, आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ देखील उपस्थित होते. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाविषयी जाणून घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले. येत्या १८ एप्रिलला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर शेअर केलेल्या पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा किस्सा सांगताना म्हणतात, “दि. ३० मार्च २०२५ , आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांचा फोन आला. योगींना भेटायचे आहे. म्हटले “सांगा कुठे येऊ ?” ते म्हणाले “योगी म्हणजे मी नव्हे! योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री.” मी तातडीने होकार भरला आणि अजय दादा (पुरकर)ला सोबत घेऊन लखनौला पोचलो. दि. ३१ ची सकाळी ११: १५ची भेटीची वेळ मिळाली होती आणि केवळ ५ मिनिटासाठी मिळाली होती. अनेक विचार डोक्यात घेऊन लखनौच्या मुख्यमंत्री आवासात पोचलो आणि गेल्या गेल्या कळले की, दिवसाभरातली आमचीच पहिली भेट आहे. काही काळ निरंजन नाथांशी अन्य विषयावर बोलणे झाल्यावर माझ्याकडे योगी आदित्यनाथांनी सहज हसून पाहिले आणि चौकशी केली. ज्ञानोबारायांचे स्मरण करून त्यांना “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई” सिनेमाबद्दल सांगायला सुरुवात केली. पोस्टरपुढे करत म्हणालो “आता महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सिनेमा बनवत आहे. संत ज्ञानेश्वरांची…” इतक्यात समोरून ते उदगारले “मुक्ताई !… अर्थात उनकी छोटी मातृतुल्य बहन!” मी आणि अजय दादाने विस्मयाने एकमेकांकडे पाहिले. तोवर “आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा…” ही ओवी त्यांनी आम्हाला ऐकवली आणि म्हणाले की, “इतिहासाशी प्रतारणा ना करता हे सगळं दाखवायची इच्छा आणि प्रामाणिकपणा पाहिजे” त्यावर जरा धीर करून मी म्हटलं की “एक कच्चा ट्रेलर आम्ही सोबत आणला आहे. अनुमती असेल तर दाखवतो.” त्यांनी क्षणाचाही विलंब ना करता दाखवा म्हटलं. अतिशय श्रद्धेनं त्यांनी ट्रेलर पूर्ण पाहिला. चित्रपटातील ज्ञानेश्वर माउली मुक्ताबाईंना कुंडलिनी अभ्यास शिकवतात, मुक्ताई मातेचे अध्यात्मातील अधिकार दाखवणारे प्रसंग, नाथसंप्रदायाचा इतिहास अशा प्रसंगांवर दाद दिली. त्यानंतर ज्या नाथ संप्रदायाचे ते पाईक आहेत, तो नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा अलौकिक संबंध, त्या सगळ्या क्रांतीत या चारही भावंडांचं योगदान यावर भरभरून बोलले. समोर बसलेली व्यक्ती एक अभ्यासू साधक आहे , हे क्षणाक्षणाला जाणवत होतं. भेटीअंती आवर्जून म्हणाले “यह निर्मिती तो अत्यन्त सुंदर हुई है… इसी तरह से धर्म और भारतीय तत्वज्ञान के प्रति प्रामाणिकता से कार्य करते रहो. इस प्रकार संतों के कार्य दिखाने वाली और भी फिल्मे बनाइये । आपका कल्याण हो।” परतताना मनात केवळ हेच येत होत “सगळं माऊलींचं आहे, मुक्ताईच आहे… माझे केवळ पाईकपण ” ।।राम कृष्ण हरी ।। ”
‘पुष्पा’फेम अल्लू अर्जुन बदलणार स्वत:चं नाव! नेमकं कारण काय ?