(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
२०२३ च्या डिसेंबर महिन्यात मालवण या ठिकाणी नौदल दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचवेळी, मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पूर्णाकृती पुतळा आता कोसळला आहे. याबाबत हळहळ व्यक्त करून किरण माने यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी याबाबत एक पोस्ट लिहून टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि या पुतळ्याचं अनावरण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन हा पुतळा कशामुळे पडला याचे कारण सांगितले आहे. तसेच हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर भारतीय नौदलाने उभारला होता असे देखील त्यांनी सांगितले आहे. आजही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकाचे राजकारण सुरु आहे अशी टीका केली आहे. तर किरण माने यांनी एक पोस्ट लिहून पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे.
किरण माने यांनी शेअर केलेली पोस्ट
“कुठल्याही कलेत सौंदर्यशास्त्राला खूप महत्त्वाचे स्थान आहे. शिल्पकलेत तर सर्वोच्च दर्जाचा ॲस्थेटिक सेन्स लागतो. छत्रपती शिवरायांसारख्या अद्वितीय महापुरूषाचं शिल्प बनवताना त्याचा कस लागतो. सातार्याच्या शिवतिर्थावर मी जेव्हा-जेव्हा जातो. तेव्हा या पुतळ्याला अर्धा-अर्धा तास निरखून बघत बसतो…माझ्या राजाचा तो रूबाब, तो डौल, नजरेची धार, करारी चेहरा, वार्यानं उडणारा अंगरखा, त्या अंगरख्यावरचा सुंदर कशिदा, ऐटीत पुढे ठेवलेला डावा पाय, त्या सणसणीत पिंडर्या, पायातल्या श्रीमंती मोजड्या, रूंद दणकट खांदे, बळकट पिळदार बाहू, पहाडासारखी छाती, मजबूत मुठीत घट्ट पकडलेली समशेरीची मुठ, तलवारीच्या म्यानावरचे अप्रतिम नक्षीकाम, मनगटापासून कोपरापर्यन्तचे ते संरक्षक कवच, सलवारीला पडलेल्या चुन्यांपासून दाढीचा आणि मिशीच्या एकेका केसापर्यन्त सगळं त्या शिल्पकारानं नजाकतीनं कोरलंय… मी ते सगळं डोळ्यांत साठवून ठेवतो.” असे किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
हे देखील वाचा- Suhasini Deshpande Dies : ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा
तसेच ते पुढे म्हणाले, “जेव्हा मी मालवणचा पुतळा पाहिला तेव्हाच लक्षात आलं होतं की या शिल्पकाराला काडीचीही सौंदर्यदृष्टी नाही. शिल्पकलेतल्या इयत्ता पहिलीतल्या ढ विद्यार्थ्याला वशिल्यानं हे काम मिळालं असावं बहुतेक. पण शेवटी महाराज हे महाराज आहेत. लहान मुलानं काढलेलं महाराजांचं वेडंवाकडं चित्र असलं तरी ते आदरानं कपाळाला लावणारे आम्ही… त्या पुतळ्यालाही लवून मुजरा केला होता. आज त्यामागचा सगळा भ्रष्टाचार कळतोय… त्या शिल्पामध्ये सौंदर्यशास्त्राबरोबरच उत्कृष्ट दर्जाच्या सामुग्रीचाही अभाव होता… इंजिनियरींग वगैरे काही अभ्यासच नव्हता. माझे जिवलग मित्र आणि देशातल्या मोजक्या नामवंत शिल्पकारांपैकी एक भगवान रामपुरे यांनी या घटनेचं तब्येतीत पोस्टमार्टेम करणारं विश्लेषण केलंय. एकंदरीत काय, तर सुमार दर्जाचे लोक सत्तेत बसल्यावर देशातल्या प्रत्येक गोष्टीला त्याच पातळीवर आणून ठेवतात, हेच खरं !” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा आहे. लोकांनी या पोस्टवर खूप प्रचंड प्रतिसाद देखील दिला आहे.