‘मी नथुराम गोडसे बोलतोय...’ नाटकाचं हिंदीमध्ये विशेष प्रयोग, केव्हा आणि कुठे होणार प्रयोग ?
प्रदिप दळवी लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय…’ हे मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग १० जुलै १९९८ साली पार पडला होता. तर शेवटचा प्रयोग २५ ऑगस्ट २०२४ रोजी… तब्बल २६ वर्षांचा प्रयोग संपला असून आता हे नाटक प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे, पण ते हिंदी भाषेमध्ये… मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक आता हिंदी रंगभूंमीवर नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय…’ हे बहुचर्चित नाटक मराठीतून हिंदीत यावं यासाठी निर्माते परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर आणि लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी पुढाकार घेतला आहे. परितोष पेंटर प्रस्तुत आणि भरत दाभोळकर लिखित दिग्दर्शित ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ या हिंदी नाटकाचे दोन विशेष प्रयोग रविवार १५ डिसेंबरला दुपारी २.३० वा. आणि सायं.५.३० वा. पुण्याच्या नेहरू मेमोरियल सभागृहात रंगणार आहे. मराठीतील हे नाटक हिंदीमध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’या मूळ नाटकावर या हिंदी नाटकाचे रूपांतर करण्यात आले आहे. यातील नथुराम गोडसे यांची भूमिका अभिनेता विकास पाटील तर महात्मा गांधी यांची भूमिका अनंत महादेवन यांनी साकारली आहे. या दोघांसोबत भरत दाभोळकर, मोहन आझाद, कौस्तुभ सावरकर, संदीप जंगम, मंगेश देसाई आणि डॉ. दीपा भाजेकर यांनी या नाटकात भूमिका केल्या आहेत. आयडियाज एंटरटेनमेंटच्या ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ या हिंदी नाटकाच्या निर्मितीची धुरा सेजल दिपक पेंटर यांनी सांभाळली आहे.
‘मराठीव्यतिरिक्त इतर भाषिक जे प्रेक्षक आहेत, त्यांनाही महात्मा गांधींच्या मृत्यूमागचं कारण, नथुराम गोडसे व्यक्ती म्हणून नक्की कशी होती? हे या नाटकामुळे जाणून घेता येईल. ‘गांधीजींना मानणारा ते त्यांचा मारेकरी’असा नथुराम गोडसे यांचा प्रवास या नाटकाच्या निमित्ताने उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निर्माते परितोष पेंटर आणि लेखक, दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी सांगितले. शरद पोंक्षे यांच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचं लेखन प्रदीप दळवी यांनी केलं असून विनय आपटे यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 1997 मध्ये या नाटकाला विरोध झाल्यानंतर ८१७ व्या प्रयोगानंतर हे नाटक बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा इतिहास रंगमंचावर नव्याने अवतरला. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर या नाटकाचे प्रयोग थांबवण्यात आले होते. त्यानंतर सहा वर्षांनी आता पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर आलं.