
'राज ठाकरेंच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची गरज'; अमित साटमांचा जोरदार पलटवार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील “फिंगरप्रिंट तपासावेत” अशी केलेली टीका आता राजकीय वादाचा नवा विषय ठरली आहे. या वक्तव्याला उत्तर देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार करत, “त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची आवश्यकता आहे,” अशी टीका केली.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित साटम म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पक्षाचे सध्या ना विधानसभा, ना लोकसभेत प्रतिनिधित्व आहे. मुंबई महानगरपालिकेतही मर्यादित संख्येने नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे इतरांवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय कामगिरीचा आढावा त्यांनी घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला.
राज ठाकरे यांच्या भाषणशैलीवर टीका करत साटम म्हणाले की, “आरोप-प्रत्यारोप करणे हे त्यांच्यासाठी नवीन नाही. ते केवळ कार्यकर्त्यांसमोर भाषणे करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. फक्त टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करावी,” असेही त्यांनी म्हटले.
मराठी तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर बोलताना साटम यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप इंडिया आणि एमएसएमईसारख्या उपक्रमांमुळे लाखो युवकांना रोजगार आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी केला. भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर पोहोचल्याचा उल्लेख करत त्यांनी विकासाच्या विषयांवर चर्चा करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी शिवउद्योगच्या माध्यमातून मनसेने किती मराठी युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला, याचाही हिशेब राज ठाकरे यांनी द्यावा, असे आव्हान दिले. “फक्त अभिनय आणि उपरोधिक टीका करण्यापेक्षा वस्तुनिष्ठ चर्चेला सामोरे जावे,” असेही त्यांनी म्हटले.
अमित साटम यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पक्षातील मोठ्या प्रमाणावर आमदारांनी साथ सोडल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मुंबई महानगरपालिकेतील कारभाराबाबतही त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.
Sanjay Raut News: २०२९ च्या आधीच राजकीय बाजार उठलेला असेल; भाजपच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांचा पलटवार
राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे मुद्देसूद राजकारण करण्याऐवजी केवळ टीका आणि उपरोधिक वक्तव्यांवर भर देतात, असा आरोप साटम यांनी केला. दरम्यान, राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेल्या या शाब्दिक संघर्षामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.