
"जालियनवाला बागची आठवण झाली"; विद्यार्थी लाठीचार्जनंतर संसद परिसरात चंद्रशेखर आझाद यांचे धरणे आंदोलन
नवी दिल्ली: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईनंतर देशातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. संसद भवनाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखल्यानंतर झालेल्या लाठीचार्जाचा निषेध करत भीम आर्मीचे संस्थापक आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संसद परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
सोमवारी आंदोलनकर्त्यांनी संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारून अनेक आंदोलकांना अडवले. तरीही काही आंदोलक संसद परिसराच्या दिशेने पुढे सरकल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कारवाई केली. या घटनेनंतर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर आझाद यांनी सोमवारी रात्री संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शांततापूर्ण धरणे आंदोलन सुरू केले. मुसळधार पावसातही त्यांनी तेथे ठिय्या देत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आझाद म्हणाले की, “विद्यार्थ्यांवर झालेली पोलिस कारवाई अत्यंत वेदनादायी असून लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलनाचा आवाज दडपण्यासाठी बळाचा वापर होणे हे लोकशाही मूल्यांसाठी चिंताजनक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले की, “विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत जबाबदार असलेल्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई होईपर्यंत आपला संघर्ष सुरू राहील. या आंदोलनामागील विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने संवाद साधावा आणि प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा,” अशीही त्यांनी भूमिका मांडली.
आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत ते म्हणाले, ” ज़ुल्म जब भी हद से आगे बढ़ने लगता है, वहीं से बदलाव का सूरज निकलने लगता है।”
ज़ुल्म जब भी हद से आगे बढ़ने लगता है,
वहीं से बदलाव का सूरज निकलने लगता है। आज जंतर-मंतर पर बच्चों और बच्चियों के साथ जिस प्रकार का बर्बरतापूर्ण व्यवहार किया गया, उसने मन को गहराई तक झकझोर दिया। मैंने जलियांवाला बाग का वह दौर नहीं देखा, लेकिन आज जो दृश्य सामने आए, उन्होंने… pic.twitter.com/iaLOkDTv5c — Chandra Shekhar Aazad (@BhimArmyChief) July 20, 2026
“आज जंतर मंतर येथे लहान मुले आणि मुलींवर झालेल्या अमानुष वागणुकीने माझे मन हादरले. मी जालियनवाला बाग घटनेचा साक्षीदार नव्हतो, पण आज घडलेल्या दृश्यांनी मला इतिहासातील त्या काळ्या अध्यायाची नक्कीच आठवण करून दिली. लोकशाहीत, शांततेने आपली मते व्यक्त करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. जर त्या अधिकाराला बळाचा वापर करून दडपले गेले, तर तो केवळ काही व्यक्तींवरच नव्हे, तर लोकशाही मूल्यांवरही केलेला हल्ला आहे.”
“या वेदनेसह आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याच्या निर्धाराने, मी आजपासून संसद भवन परिसरातील परमपूज्य बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली धरणे धरून बसलो आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा शांततापूर्ण लोकशाही संघर्ष सुरूच राहील.”
दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांनी सुरुवातीपासूनच दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. रविवारी रात्री आंदोलनस्थळी तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जंतरमंतर येथे उपस्थित राहून आंदोलकांशी संवाद साधला होता. दिल्लीतील आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे हा विषय आता राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून विविध राजकीय पक्षांकडून त्यावर सातत्याने प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.