
विलिनीकरणाच्या मुद्यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात वादंग; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे मात्र मौन
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय हालचाली सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी नेत्यांकडून सातत्याने विधाने केली जात असली तरी अंतिम निर्णयाचा अधिकार असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अद्याप मौन बाळगले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांची धास्ती वाढली आहे.
विलिनीकरणावर निर्णय घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार लवकरच आमदारांशी ‘वन-टू-वन’ बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेणार आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार हीरामन खोसकर यांनी दावा केला आहे की, ८० टक्क्यांहून अधिक आमदार विलिनीकरणाच्या बाजूने आहेत. तर प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, सध्या तरी दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही. मात्र, सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्या या विषयावर अंतिम निर्णय घेतील. दिवंगत अजित पवार यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की, सध्या विलिनीकरणाचा मुद्दा पक्षाच्या अजेंड्यावर नाही. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला बळ देणे हीच पक्षाची प्राथमिकता आहे. त्या पक्षप्रमुख म्हणून स्थिरावल्यानंतर योग्यवेळी निर्णय घेतील, असे भुजबळ म्हणाले.
प्रस्ताव आल्यास विचार करू : तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की, शरद पवार गटाकडून अद्याप विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. अधिकृत प्रस्ताव आल्यास पक्ष त्यावर विचार करेल, असे ते म्हणाले. सध्या पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक असून, त्यात कायम राहण्याचा निर्णय असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
विलीनीकरणाचा विषय आता बंद : शशिकांत शिंदे
शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की, अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाबाबत निर्णय झाला होता. मात्र, सध्या विलीनीकरणाचा विषय पूर्णपणे बंद केला आहे. आम्हीच त्यासाठी मागे लागलो आहोत, असे चित्र चुकीचे आहे. आमच्याकडून कोणतीही घाई करण्यात आलेली नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : कॅबिनेटमंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला