बाळासाहेब ठाकरेंची किरण पावसकरांकडून जाहीर मंचावर खिल्ली !
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. फुटीर खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात करण्यात आलेल्या एका वक्तव्यामुळे शिंदे गट अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले नेते किरण पावसकर यांनी जाहीर मंचावर केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. याच कार्यक्रमात भाषण करताना किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना एक वादग्रस्त टिप्पणी केली.
“मुलाला सांभाळा, नातवाला सांभाळा… हे काय पाळणाघर आहे का?” असे वक्तव्य पावसकर यांनी केले. त्यांच्या या विधानाचा संबंध बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना राजकारणात पुढे आणण्याच्या निर्णयांशी जोडला जात असून, त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे बाळासाहेबांच्या भूमिकेची खिल्ली उडवल्याचा आरोप होत आहे.
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक शिवसैनिक आणि ठाकरे समर्थकांनी नाराजी व्यक्त करत, बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पक्षातच त्यांच्या वारशावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी वक्तव्ये कशी केली जाऊ शकतात, असा सवाल उपस्थित केला आहे. दुसरीकडे, काही जणांनी हे वक्तव्य केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरील राजकीय टीका असल्याचेही म्हटले आहे.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घडल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आणि हिंदुत्वाच्या भूमिकेचे आम्ही खरे वारसदार असल्याचा दावा सातत्याने करणाऱ्या शिंदे गटासमोर आता या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
किरण पावसकर यांच्या वक्तव्याबाबत शिवसेनेकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसली, तरी या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता पक्ष नेतृत्व या प्रकरणाकडे कशा पद्धतीने पाहते आणि पुढे काही कारवाई केली जाते का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






