
‘नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटली’; हसन मुश्रीफांचा अधिकाऱ्यांना इशारा
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची खराब अवस्था पाहून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. ‘आज जे पाहिले ते पाहून मला लाज वाटली,’ अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
सुरतहून नंदुरबारकडे येताना रस्त्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गुजरातची हद्द संपल्यानंतर महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था खराब असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच श्रावणीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही स्थिती चांगली नसल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्यांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत. पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते उखडत असतील तर त्याची कारणे शोधली पाहिजेत, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. संबंधित विभागाला याबाबत जाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
नंदुरबारचे रस्ते व्यवस्थित आणि दर्जेदार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. खराब रस्ते आणि निकृष्ट कामांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यास जिल्ह्याचा विकास होणार नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.
नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून मुश्रीफ यांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे उदाहरण दिले. कोल्हापुरात अशी परिस्थिती असती तर अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांनाही सोडले नसते, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पालकमंत्री म्हणून नंदुरबारची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळा संपल्यानंतर नंदुरबारमध्ये चांगले आणि दर्जेदार रस्ते करण्याची गरज असल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले. नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने या भागाच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. मात्र, या निधीचा योग्य आणि प्रभावी वापर झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री म्हणून वेळात वेळ काढून विकासकामांचा आढावा घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाहीही हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली.