Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात
कराड/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर झालेली दडपशाही, बेरोजगारीचे वाढते संकट आणि सरकारच्या धोरणांबाबत युवकांमध्ये निर्माण झालेला असंतोष आता व्यापक स्वरूप घेत आहे. हा असंतोष केवळ आंदोलनांपुरता मर्यादित राहणार नसून, त्याचे राजकीय परिणाम आगामी काळात दिसून येतील. युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात आहे, असा जोरदार हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर विविध मुद्द्यांवरून टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान सरकारने मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे देशातील युवा वर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष आगामी काळात सत्ताबदलाचे कारण ठरू शकतो, असा दावा त्यांनी केला.
सरकारकडून स्टार्टअप, गुंतवणूक आणि विकसित भारताच्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र, भविष्यात रोजगाराच्या संधी किती उपलब्ध होतील, याचा सरकारने गांभीर्याने विचार केला आहे का, असा सवाल चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासह वकिली, पत्रकारिता आणि अन्य अनेक क्षेत्रांतील रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ठोस धोरण सरकारने स्पष्ट करावे. ‘विकसित भारत’ नेमका कसा घडविणार, याबाबत सरकारच्या कोणत्याही तज्ज्ञ व्यक्तीसोबत खुल्या व्यासपीठावर चर्चा करण्यास आपण तयार असल्याचे आव्हान त्यांनी दिले.
ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा
देशाचे भविष्य असलेल्या युवकांसाठी सरकारकडे ठोस दिशा नाही. साध्या परीक्षाही सरकारला सुरळीतपणे घेता येत नसतील, तर युवकांनी सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल चव्हाण यांनी केला. विद्यार्थी आणि युवकांच्या आंदोलनात काँग्रेसने राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, आंदोलकांवर सरकारने अमानुष कारवाई केली, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनादरम्यान गोळीबार, अश्रुधुराचा वापर आणि लाठीहल्ल्याचे आदेश कोणी दिले, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, राजधानी दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांशी संबंधित आहे. त्यामुळे आंदोलनांवर झालेल्या कारवाईचे आदेश कोणी दिले, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट करावे. त्यांच्या आदेशाशिवाय अशी कारवाई झाली असेल तर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे चव्हाण म्हणाले. युवकांच्या प्रश्नांवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत निवेदन करणे आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दुबार व बोगस मतदार असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. कराड दक्षिणमध्ये सुमारे २८ ते २९ हजार दुबार मतदार असून, शेजारील मतदारसंघांतील मतांसह हा आकडा सुमारे ५६ हजारांपर्यंत जात असल्याचे त्यांनी सांगितले. या मतदारांची छाननी करून नावे वगळण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतर सुमारे ४८ हजार मते कमी झाल्याची माहिती आहे. ही प्रक्रिया विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली असती तर कराड दक्षिणचा निकाल वेगळा लागला असता, असा दावा त्यांनी केला. आगामी निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करताना निवडणुकीतील कथित गैरप्रकारांवर त्यांनी भाजपला लक्ष्य केले.
बिहार आणि मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. हे बदलाचे संकेत असून, युवकांचा असंतोष वाढत गेल्यास त्याचे राजकीय पडसाद उमटतील. विरोधी पक्षापेक्षा युवकांच्या आंदोलनातूनच राज्यातील सत्तेचे चित्र बदलण्याची शक्यता आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.
अमेरिकेतील एपिस्टीन प्रकरणाशी संबंधित सुमारे ६० लाख कागदपत्रे आहेत, त्यातील ३० लाख कागदपत्रे सार्वजनिक झाली असून उर्वरित कागदपत्रेही अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांपूर्वी समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा भारतावर काय परिणाम होईल, हे सध्या सांगता येत नसले तरी एपिस्टीन फाईलचा विषय अद्याप संपलेला नसल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
वडेट्टीवार यांनी पंकजा मुंढे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याच्या मुद्द्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी, गोपीनाथ मुंढे यांच्याबाबतचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंढे यांना काँग्रेसमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न केला होता. याबाबत तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे अधिकार पंतप्रधानांकडे असतात. त्यांच्याशी आधी चर्चा न करता आपण पुढाकार घेतल्याने मनमोहन सिंग नाराज झाले. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्याला काँग्रेसमध्ये घेऊन मंत्रिपद देणे म्हणजे आमिष दाखवल्यासारखे होईल, ही चूक मी करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर गोपीनाथ मुंढे यांची भेट घेऊन हा प्रस्ताव शक्य नसल्याचे सांगितले. ही आपल्या राजकीय कारकिर्दीतील मोठी चूक असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

