
Pruthviraj Chavhan on Amit Shah
मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन, आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज आणि बिहारमधील आंदोलनादरम्यान समोर आलेल्या AK-47 प्रकरणावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या घटनांबाबत केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी करत चव्हाण यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आंदोलनादरम्यान संसदेकडे मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांकडून कारवाई झाल्याचा आणि काही आंदोलक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला अनेक प्रश्न उपस्थित केले. आंदोलनादरम्यान गोळीबार झाला का, पॅलेट गनचा वापर झाला का, एखादा आंदोलक जखमी झाला का, याबाबत सरकारने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
बिहारमधील आंदोलनादरम्यान कथितरीत्या AK-47 दाखवण्यात आल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. अशा प्रकारचे आदेश कोणी दिले, याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी द्यावे, असे चव्हाण म्हणाले.
“संसदेत येऊन सरकारने प्रश्नांची उत्तरं द्यावीत. उत्तरं समाधानकारक असतील तर आम्ही पुढे काही म्हणणार नाही. मात्र सभागृहाला सामोरे जाणे टाळले जात असेल तर हा गंभीर विषय आहे,” असा दावा चव्हाण यांनी केला. अमित शाह अधिवेशनादरम्यान संसदेत उपस्थित न राहिल्याबद्दलही त्यांनी टीका केली. सभागृहात येऊन विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जाणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
नीट परीक्षेपासून विविध स्पर्धा परीक्षांपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने भूमिका घेण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा विद्यार्थ्यांच्या दबावामुळे झाला, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
चव्हाण यांनी पुढील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना विरोधकांनी एकत्र राहण्याची गरज व्यक्त केली. केंद्र सरकारविरोधात विविध प्रश्नांवर विरोधकांनी सातत्याने आवाज उठवला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताबदल होईल, असा विश्वासही व्यक्त केला.