
Ramdas kadam
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्षावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकनाथ शिंदेच दिसत आहेत, तुम्ही गद्दार म्हणत राहा तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार – खासदार वाढतायेत,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला. “एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटले म्हणजे मोदी त्यांचे बॉस झाले का? मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी तुमचे बॉस झाले होते का?” असा प्रतिप्रश्न करत कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधला. राज्याचा उपमुख्यमंत्री विकासकामांसाठी पंतप्रधानांची भेट घेऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी टीका करण्यापेक्षा आपण बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असल्याची जाणीव ठेवावी आणि आम्ही कामातून उत्तर देऊ, असे रामदास कदम म्हणाले.
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भाजप नेत्यांसोबत झालेल्या भेटींचाही दाखला दिला. अधिवेशनाच्या काळात आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांची बुके देऊन भेट घेतल्याचा दावा कदमांनी केला. “मग फडणवीस आणि इतर नेते तुमच्या पिल्लाचे बॉस झाले का?” असा खोचक सवाल त्यांनी केला. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडे असतात, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावे, असा सल्लाही कदमांनी दिला.
उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केवळ द्वेष असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणत राहा, मात्र तुमचा पक्ष संपत चालला असून शिंदे गटाचे आमदार आणि खासदार वाढत आहेत, असा दावा त्यांनी केला.
‘Gen Z शी बोलण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्या’; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना खोचक टोला
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करताना “चिंता करू नका, मी तुमच्या पाठिशी आहे” हा संदेश नेमका कोणाला दिला, असा सवाल केला होता. गद्दारांना आता नेमकी कसली भीती वाटते, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी हा संपूर्ण घटनाक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे म्हटले होते. याच टीकेवरून आता शिंदे गटाकडून पलटवार करण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.