
मोदी पंतप्रधान असताना अमित शाह यांना एवढी घाई का?; खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गट पक्षातील कथित खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देशभरात विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण सुरू असून त्यामागे अमित शाह यांची रणनीती असल्याचा आरोप करत, “नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना अमित शाहांना पंतप्रधान होण्याची एवढी घाई का लागली आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांनी देशभरात भाजपकडून विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला. “प्रचंड पैसा, ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्याचे काम सुरू आहे. ही संपूर्ण यंत्रणा अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या चर्चांवर बोलताना राऊत म्हणाले की, संबंधित खासदारांनी अद्याप अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते अजूनही शिवसेनेचे सदस्य आहेत. “जर कुणाला वाटले असेल की आपण चुकीचा निर्णय घेतला किंवा भरकटलो, तर त्यांच्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे आजही खुले आहेत. आम्ही कोणत्याही खासदाराचे नाव घेऊन टीका केलेली नाही. मात्र पक्षाचा व्हीप असताना बैठकीला अनुपस्थित राहणे आणि विरोधी हालचाली करणे योग्य नाही,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.
ओमराजेंना परत आणण्यासाठी हालचाली? संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
खासदारांना व्हीप जारी करण्याच्या निर्णयाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, काही खासदार दिल्लीत राहून सत्ताधारी पक्षातील नेत्यांसोबत बैठका घेत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे पक्षविरोधी हालचाली रोखण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला. “पक्षाच्या भूमिकेविरोधात काम होत असल्याची माहिती मिळत होती. त्यामुळे संघटनात्मक शिस्त राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला,” असे त्यांनी सांगितले.
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निधीबाबतच्या वक्तव्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “विकासकामांसाठी निधी मिळत नाही, अशी तक्रार आता केली जात आहे. पण निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या तिकिटावर निवडून येताना परिस्थिती माहीत नव्हती का?” असा सवाल त्यांनी केला. “उद्धव ठाकरे आणि पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली, जनतेने निवडून दिले. आता निधीच्या कारणावरून भूमिका बदलली जात असेल, तर निधी जनतेच्या विकासासाठी हवा की स्वतःच्या विकासासाठी, हा प्रश्न निर्माण होतो,” असा टोला त्यांनी लगावला.
शिवसेनेतील कथित खासदार फुटीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण तापले असून, आगामी काळात या प्रकरणावर आणखी मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.