
अमित शाह यांचे मुंबईत आगमन; फडणवीसांकडून स्वागत, इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
मुंबई/कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबई दौऱ्यावर आले असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमित शाह यांनी मुंबईतील स्वागत समारंभानंतर पुढील नियोजित कार्यक्रमांसाठी प्रयाण केले. त्यांच्या दौऱ्याला राज्याच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमात कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्ताराचाही सोहळा पार पडला.
‘माहितीचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न’; RTI नियम 2026 रद्द करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
कार्यक्रमादरम्यान प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराच्या औद्योगिक विकासाशी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे घनिष्ठ नाते आहे. ५ नोव्हेंबर १९६२ रोजी स्थापन झालेल्या या बँकेने ७ फेब्रुवारी १९६३ पासून प्रत्यक्ष कामकाज सुरू केले.
आज ही बँक महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये मिळून ५५ शाखांच्या माध्यमातून सेवा देत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेकडे ८५ हजारांहून अधिक सभासद, ८१ कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल, सुमारे २,९७५ कोटी रुपयांच्या ठेवी आणि १,८९४ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जवाटप नोंदविण्यात आले आहे.
RTI नियमांवर अण्णा हजारे आक्रमक; बदल मागे न घेतल्यास फडणवीस सरकारविरोधात उपोषणाचा इशारा
बँकेने स्वयंप्रकाश सोलर कर्ज, कृषी कर्ज, केंद्र सरकारच्या फूड प्रोसेसिंग योजनांची अंमलबजावणी, परकीय चलन व्यवहार, लेटर ऑफ क्रेडिट, बँक गॅरंटी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सेवा अशा विविध आधुनिक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांमधील कर्जसुविधांद्वारे तरुणांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देण्याचे काम बँकेकडून करण्यात येत असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम सहकार, बँकिंग आणि औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.