
नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर (Photo Credit- X)
“मी दुसरीकडे कुठेही गेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय! मी बाळासाहेबांची विचारधारा सोडलेली नाही,” असे स्पष्ट करत आष्टीकरांनी आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतपणे सामील झाल्याचे जाहीर केले. मतदारसंघात रखडलेली विकासकामे आणि निधीची चणचण यामुळेच आपण सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी परखडपणे कबूल केले आहे.
बंडखोरीचे मुख्य कारण स्पष्ट करताना नागेश पाटील आष्टीकर भावुक झाले. ते म्हणाले, “आम्ही सर्व ६ खासदार १८ जून २०२६ पर्यंत कुठेही गेलो नव्हतो. मात्र, त्या दिवशी मेळाव्यात ज्या पद्धतीने आमच्यावर अविश्वास दाखवला गेला, भाषेचा अतिरेक झाला आणि बोचऱ्या शब्दांत टीका करण्यात आली, त्याने आमची मने दुखावली. तिथल्या वागणुकीमुळेच आता ‘उबाठा’ सेनेत थांबून काही उपयोग नाही, असा विचार सर्व सहकाऱ्यांनी केला.”
ओमराजेंना परत आणण्यासाठी हालचाली? संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
मतदारसंघातील जनतेशी नाळ जोडताना आष्टीकर म्हणाले, “लोकांनी मला खूप मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने खासदार म्हणून निवडून दिले आहे. प्रत्येक गावात गेलं की नागरिक हक्काने विकासकामांची मागणी करतात. पण विरोधी पक्षात राहून पंचायत समित्या, नगरपालिका किंवा इतर कामांसाठी निधी कुठून आणायचा? सत्तेशिवाय कोणतीही कामे होत नाहीत, हेच विदारक सत्य आहे. मी जे पाऊल उचलले आहे, ते केवळ हिंगोलीच्या विकासासाठी आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, मतदारांनी मला ‘सालानं’ ठेवलं आहे, मी तुमचं साल प्रामाणिकपणे आणि नेकीनं करेन. माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी जीवापाड जपेन.”
सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. “अनेकांना माझी भूमिका पटली नसेल, काहींना पटली असेल. मात्र, माझ्यावर रागावलेल्या कार्यकर्त्यांना मी माझ्या कामातून उत्तर देईन. कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, राग व्यक्त करा पण असंवैधानिक किंवा गलिच्छ भाषा वापरू नका. कारण, ‘आपल्याच गावच्या बाभळी आणि आपल्याच गावच्या बोरी’ असतात, आपल्याला एकत्रच राहायचे आहे. संजय राऊत किंवा इतर कोणी माझ्यावर टीका करत असतील, तर त्यांचा माझ्यावर हक्क आहे, त्यामुळे मला वाईट वाटणार नाही,” असे आष्टीकर म्हणाले.