
'विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी,' विजय वडेट्टीवार यांचा घणाघात
नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी संतप्त असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनाबाबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गरज नाही, विद्यार्थीच दहशतवादी आहेत,” असे वक्तव्य केल्याने राज्यभरातून टीकेचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज बाबत देशभरात संतापाचे वातावरण असताना सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. याबाबत आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी संदभाऊ खोत यांना चांगलेच सुनावले आहे.
सदाभाऊ खोत यांनी जंतर मंतर वरील विद्यार्थी आंदोलकांवर टीका करत त्यांना ‘दहशतवादी’ असल्याची टीका केली होती त्यावरून आता विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून टीका करत प्रत्युत्तर दिले आहे.
“जालियनवाला बागची आठवण झाली”; विद्यार्थी लाठीचार्जनंतर संसद परिसरात चंद्रशेखर आझाद यांचे धरणे आंदोलन
विजय वडेट्टीवार आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हणाले, “NEET पेपरफुटीने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त केले, २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याविरोधात न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी!”
NEET पेपरफुटीने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त केले, २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याविरोधात न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी! केवळ भाजपाच्या कृपेने आपल्याला फुकटची आमदारकी मिळाली म्हणून सदाभाऊ खोत… pic.twitter.com/1gAcqbaARg — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 21, 2026
“केवळ भाजपाच्या कृपेने आपल्याला फुकटची आमदारकी मिळाली म्हणून सदाभाऊ खोत भाजपाचे बटिक झाले आहेत. त्यांनी देशातील तरुणाईचा केलेला हा अवमान संतापजनक आहे! शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना तुम्ही आतंकवादी होतात का? भाजपची पाप लपवण्यासाठी तरुणांना आतंकवादी ठरविण्याचा अधिकार कोणी दिला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर टीका केली होती. “राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी देशात दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र आहेत, त्यामुळे काही बदल होणार नाही. सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नये. या दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने जशास तसे उत्तर द्यावे,” असे वक्तव्य त्यांनी केले होते.