
फोटो सौजन्य- chatgpt
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांनी अध्यात्म, समाजप्रबोधन आणि सेवाकार्य यांचा सुंदर संगम घडवत लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवले. १ मार्च १९२२ रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून समाजप्रबोधनाची परंपरा होती. दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांच्या पूर्वजांना “धर्माधिकारी” ही पदवी दिली आणि त्या नावाला साजेसे कार्य नानासाहेबांनी आपल्या आयुष्यभर केले. आज लाखो लोकांचे आयुष्य नानासाहेबांनी बदलून टाकले. त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले.
१९४३ मध्ये त्यांनी श्रीसमर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली आणि “श्री बैठक” या उपक्रमातून संत रामदास स्वामी यांच्या दासबोधावर, गुरूचरित्र वर आणि संतवाङ्मयावर आधारित अध्यात्माची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. आज या बैठका विविध भारतीय भाषांतून देश-विदेशात आयोजित केल्या जात असून लाखो जणांना संस्कार, नैतिक मूल्ये आणि अध्यात्माची प्रेरणा देत आहेत. जेथे एसटी बस, वीज पोहोचली नव्हती ते बैठकीचे, नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार पोहोचले होते.
नानासाहेबांनी संस्कारांच्या बळावर समाजात अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनाधीनता, स्त्रियांवरील अन्याय आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध प्रभावी जनजागृती केली. “मनुष्य ही एकच जात आणि मानवता हाच एक धर्म” हा त्यांचा संदेश समाजमनाला नवी दिशा देणारा ठरला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या विचारांचा वारसा पुढे त्यांचे पुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी, त्यांचा पुत्र सचिन दादा धर्माधिकारी हे नेत आहेत. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान समाजसेवेची अनेक लोकोपयोगी कार्ये राबवत आहे. वृक्षारोपण, जलसंधारण, तलाव आणि विहिरींची स्वच्छता, ग्रामस्वच्छता, आदिवासी आणि गरजू नागरिकांना मदत, शैक्षणिक साहित्याचे वितरण, तसेच विविध सामाजिक उपक्रमांमधून प्रतिष्ठान समाजहिताचे कार्य करत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी लाखो वृक्षांची लागवड आणि संगोपन करून निसर्गरक्षणाचा आदर्शही त्यांनी समाजासमोर ठेवला.
आरोग्यसेवेच्या क्षेत्रातही प्रतिष्ठानतर्फे भव्य नि:शुल्क आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. डिसेंबर २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात दीड लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी झाली आणि या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती.
८ जुलै २००८ रोजी नानासाहेबांचे देहावसान झाले. मात्र त्यांनी दिलेली अध्यात्म, सेवा, संस्कार आणि समाजप्रबोधनाची शिकवण आजही लाखो अनुयायांच्या कार्यातून जिवंत आहे. समाजहितासाठी समर्पित जीवन कसे असावे, याचा आदर्श डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या कार्यातून संपूर्ण समाजासमोर ठेवला. आज शरीररूपाने नानासाहेब धर्माधिकारी हे नसले तरी त्यांचे अलौकिक कार्य अखंडपणे चालू राहील. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे या दोन जिल्ह्यातील संपूर्ण गावाचं बैठकीला जाणारे आहेत. त्यांनी सुरू केलेले हे व्यक्तीनिर्मानाचे, समाजप्रबोधनाचे कार्य असेच सुरू राहिलं आणि एक संस्कारी, सुशिक्षित पिढी निर्माण होत राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी हे प्रख्यात अध्यात्मिक मार्गदर्शक, समाजप्रबोधक आणि सेवाभावी कार्यकर्ते होते. त्यांनी अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेच्या माध्यमातून लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला
Ans: अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, जातिभेद निर्मूलन, स्त्री सन्मान, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, जलसंधारण, आरोग्य शिबिरे आणि समाजप्रबोधन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले.
Ans: त्यांनी दिलेले अध्यात्म, सेवा, संस्कार, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेचे विचार आजही लाखो अनुयायांना समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देत आहेत.