
फोटो सौजन्य- pinterest
संत मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना उद्देशून रचलेले “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” हे अभंग (ताटीचे अभंग) आध्यात्मिक प्रगल्भता आणि माणुसकीचा संदेश देतात. लोकांच्या शब्दांनी खिन्न होऊन ज्ञानेश्वरांनी झोपडीचे दार (ताटी) बंद केले असता, मुक्ताबाईंनी ‘योगी पुरुष पावन मनाचा, साहे अपराध जनाचा’ असे म्हणत समजूत काढली आणि विश्वकल्याणासाठी ताटी उघडण्याची विनंती केली.
संत ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार भावंडे समाजातील अन्याय, बहिष्कार आणि दुःख सहन करत होती. त्यांच्या आई-वडिलांच्या संन्यासामुळे समाजाने त्यांना बहिष्कृत केले होते. या परिस्थितीत ज्ञानेश्वरांना अनेकदा मानसिक त्रास सहन करावा लागला. एकदा ज्ञानेश्वर महाराज अत्यंत दुःखी होऊन स्वतःला एका झोपडीत बंद करून घेतात. त्यावेळी त्यांची धाकटी बहीण मुक्ताबाई प्रेमाने, करुणेने आणि तत्वज्ञानाने भरलेला हा अभंग म्हणत त्यांना बाहेर येण्यासाठी विनंती करते.
“ताटी उघडा ज्ञानेश्वरा” या अभंगात मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना सांगतात की—
जगात दुःख आहे, अन्याय आहे, पण त्यापासून पळून जाणे हा उपाय नाही
संतांचा मार्ग म्हणजे सहनशीलता, क्षमा आणि करुणा
संतांनी समाजाला मार्गदर्शन करणे हेच त्यांचे कर्तव्य आहे.
मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना सांगतात की, “तुम्ही जर स्वतःला बंद करून घेतले, तर जगाला ज्ञानाचा प्रकाश कोण देणार?”
संत मुक्ताबाई किंवा मुक्ताबाईंचे अभंग म्हटले की, सर्वप्रथम आठवतात ते ताटीचे अभंग. ‘बहिर्मुख करणारी अंतर्मुखता’ हे या ताटीच्या अभंगांचं सूत्रच वाटतं. कारण ज्ञानोबांना अंतर्मुख करून, बाहेर येण्यासाठी प्रवृत्त करणं हे या अभंगांचं मूळ उद्दिष्ट आहे. या अभंगरचनेमागचा प्रसंग आपल्याला ज्ञात आहेच. भिक्षा मागत असताना ज्ञानदेवांचा अवमान झाल्यामुळे, खिन्न आणि उद्विग्न अवस्थेत ज्ञानेश्वर महाराज सिद्धबेटावरच्या आपल्या झोपडीच्या आत जातात, आणि ताटी आतून लावून घेतात. पुन्हा उघडायचीच नाही या संकल्पाने! जगाचा, जगाकडून मिळणाऱ्या अखंड आणि महत्त्वाचं म्हणजे अकारण अवहेलनाचा वीट त्या वयात येणं खरं अगदी साहजिकच आहे. लहानशी मुक्ताई तिथे येते तेव्हा आतून लावलेली ताटी पाहून, ती ठोठावली तरी उघडली जात नसल्याची पाहून तिला नक्कीच आश्चर्य वाटलं असणार.
ताटीचे अभंग एकूण 42 आहेत. यातील प्रत्येक अभंगाचं पालुपद म्हणजे ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ हाच या अभंगांचा मूळ उद्देशही. केवळ बाह्य ताटी उघडावी हा नव्हे, तर आतली ताटी उघडून कार्यप्रवृत्त व्हावं, चिंता, क्रोध सारं काही सांडून आपल्या कार्याचं स्मरण ठेवून तदनुरुप आचरण करावं ही प्रेरणा ही भगिनी-योगिनी आपल्या वडील, भावाला किंवा गुरुबंधूला देत आहे. त्यासाठी वापरलेल्या उपमारुपकांचं सौंदर्य ते किती! प्रसंगी मुक्ताई जरा कठोर उद्गारही काढते, पण हेतू एकच, की ज्ञानोबांनी काही करुन क्रोधादि विकारांचं मळभ कायमचं दूर सारुन आतली ताटी पुन्हा न लावण्यासाठी उघडावी.
“ताटी उघडा ज्ञानेश्वरा” अभंग १० वर्षांच्या मुक्ताबाईंनी आपल्या थोरल्या भावाला दिलेला ज्ञानाचा आणि संयमाचा उपदेश आहे, ज्यातून ‘सहिष्णुता’ आणि ‘लोकसंग्रह’ या मूल्यांचा संदेश मिळतो. हा अभंग केवळ एक भावनिक प्रसंग नसून, तो जीवनाचा मार्गदर्शक आहे. संत मुक्ताबाई यांनी आपल्या भावाला दिलेला हा संदेश आजही प्रत्येकासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. संकटे आली तरी धैर्याने, संयमाने आणि सकारात्मकतेने त्यांचा सामना करावा, हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: बाह्य दार नव्हे, तर मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेकडे वळण्याचा संदेश आहे.
Ans: हा अभंग मुक्ताबाई यांनी रचला आहे
Ans: मानसिक ताण, निराशा यावर मात करून सकारात्मक राहण्याची प्रेरणा देतो.