
फोटो सौजन्य- pinterest
समर्थ रामदास स्वामींनी वयाच्या २४ व्या वर्षी १२ वर्षांची दीर्घ पायी तीर्थयात्रा करून संपूर्ण भारतभ्रमण केले. हिमालय ते रामेश्वर अशी यात्रा करून त्यांनी तत्कालीन सामाजिक, राजकीय स्थितीचे निरीक्षण केले, ‘अस्मानी-सुलतानी’ आणि ‘परचक्रनिरूपण’ यातून ते मांडले आणि जागोजागी राम आणि हनुमंताची मंदिरे स्थापन करून लोकजागृती केली. समर्थ रामदास स्वामींच्या तीर्थयात्रेविषयी जाणून घेऊया
श्री समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म जांब या गावी (जि. जालना) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुध्द नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहुर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणे सूर्योपासक होते. नारायण सात वर्षांचा असतानाच वडील सूर्याजिपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होते. इतरांहून वेगळे होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी होते. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. याच्या बाळपणाची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा समर्थ हे लपून बसले होते, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळांत सापडले. “काय करीत होतास” असे विचारल्यावर “आई, चिंता करितो विश्वाची” असे उत्तर त्यांनी दिले होते. अशा या विलक्षण मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने १२ व्या वर्षी याचे लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी “सावधान” हा शब्द उच्चारतांच ते ऐकून, नेसलेले एक अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रानिशी हा मंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण याने तांतडी करून गावाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहांत उडी मारली.
पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन समर्थानांचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहांत छातीइतक्या पाण्यांत उभे राहून गायत्री पुरश्चरण केले. रामनामाचे १२ कोटी वेळा नामस्मरण करून अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले. १२ वर्षाच्या तीव्र तपश्चर्येनंतर त्यांना आत्म-साक्षात्कार झाला. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षांचे होते.
पुढील १२ वर्षे समर्थांनी तीर्थयात्रा केली. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोक-स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले. भारत-भ्रमण करीत असता पंजाबांत शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांच्याशी समर्थांची भेट झाली होती. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा झाली होती. ‘समान-शिले-व्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने दोघांत सख्य झाले होते. याचवेळी प्रचलित सर्व शास्त्रांचा अभ्यासही केला आणि वयाच्या ३६ व्या वर्षी ते महाराष्ट्रात परत आले.
आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा त्यांना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षांच्या प्रवासांत त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चरित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्याकाळी भारतातील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, माता-भगिणी, देव, धर्म, संस्कृती, कांहीच सुरक्षित नव्हते. ही अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ झाले, उद्विग्न झाले.
मसूरास रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याला पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राम-मंदिराची स्थापना केली. निरनिराळ्या गावात अकरा मारूतींच्या मंदिराची स्थापना केली. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोक-संग्राहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला.
धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारूती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत: डोंगरदर्यात राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. हे राष्ट्र बलसंपन्न व्हावा, यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाजसंघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. छत्रपती शिवाजी महाराज आग्य्राहून सुटून महाराष्ट्रांत परत आले, तेव्हा त्या जोखमीच्या परतीच्या प्रवासांत या मठांचा त्यांना उपयोग झाला होता. महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढे सज्जनगडावर वास्तव्य केले. सन १६८१ समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला. हीच दासनवमी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर, वयाच्या सुमारे 24 व्या वर्षी त्यांनी 12 वर्षांची दीर्घ तीर्थयात्रा सुरू केली.
Ans: समाजाची दीन अवस्था पाहून त्यांनी केवळ अध्यात्म नव्हे तर समाजसंघटन आणि राष्ट्रनिर्मितीवर भर दिला.
Ans: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेत समर्थांनी प्रेरणा आणि मार्गदर्शन दिले.