
फोटो सौजन्य- pinterest
सोमनाथ या नावामागे अत्यंत प्राचीन कथा सांगितली जाते. चंद्रदेव अर्थात “सोम” यांना दक्ष प्रजापतीने शाप दिला होता. त्या शापामुळे चंद्राचे तेज नष्ट होऊ लागले. तेव्हा चंद्रदेवांनी प्रभास क्षेत्रात भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला शापमुक्त केले. त्या स्मरणार्थ चंद्रदेवांनी येथे सुवर्णमंदिर उभारले, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या स्थानाला “सोमनाथ” म्हणजे “सोमाचा नाथ” असे नाव प्राप्त झाले. स्कंदपुराण, शिवपुराण आणि अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये सोमनाथ क्षेत्राचे वर्णन आलेले आहे. प्रभास क्षेत्र हे श्रीकृष्णांनी देहत्याग केलेले स्थान म्हणूनही ओळखले जाते.
इतिहासकारांच्या मते, सोमनाथ मंदिर प्राचीन काळापासून अत्यंत समृद्ध होते. समुद्रकिनारी असल्यामुळे व्यापारमार्गांशी त्याचा संबंध होता. देशभरातून भाविक येथे येत असत. मंदिरात मोठ्या प्रमाणात सुवर्ण, रत्ने आणि दानसंपत्ती जमा होत असे. मंदिराची वास्तुशैली, भव्य सभामंडप, सुवर्णकलश आणि शिल्पकला पाहून परकीय प्रवासीही चकित होत असत.
इ.स. १०२५ मध्ये अफगाणिस्तानातील आक्रमक गझनीने याने सोमनाथ मंदिरावर भयंकर आक्रमण केले. त्या काळात सोमनाथ मंदिर अतिशय श्रीमंत असल्याची माहिती गझनीला मिळाली होती. लुटीच्या उद्देशाने त्याने हजारो सैनिकांसह भारतावर स्वारी केली. इतिहासातील वर्णनांनुसार, मंदिराचे रक्षण करण्यासाठी हजारो हिंदूंनी प्राणांची आहुती दिली. गझनीने मंदिरातील संपत्ती लुटली, मंदिराचा विध्वंस केला. असे म्हटले जाते की, या लुटीत प्रचंड प्रमाणात सोने, हिरे आणि रत्ने नेण्यात आली. परंतु विशेष गोष्ट म्हणजे, मंदिर उद्ध्वस्त झाले तरी हिंदू समाजाची श्रद्धा संपली नाही. पुढील काळात अनेक राजांनी पुन्हा मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला.
सोमनाथ मंदिरावर इतिहासात अनेक वेळा आक्रमणे झाली. दिल्ली सल्तनत आणि इतर इस्लामी आक्रमकांनीही मंदिर उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. तरीही प्रत्येक वेळी हिंदू समाजाने मंदिर पुन्हा उभे केले. यामुळे सोमनाथ हे “अखंड श्रद्धेचे प्रतीक” बनले. मंदिराच्या पुनर्बांधणीमागे केवळ धार्मिक भावना नव्हती, तर भारतीय संस्कृती जपण्याचा निर्धार होता.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा संकल्प केला. जुनागढ संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर पटेल प्रभास पाटण येथे आले. मंदिराची अवस्था पाहून त्यांनी मंदिर पुन्हा भव्य स्वरूपात उभारण्याचा निर्णय घेतला.
सरदार पटेलांनी स्पष्टपणे सांगितले की, सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण हे केवळ मंदिर उभारणे नसून, गुलामीत खचलेल्या भारतीय आत्म्याचे पुनरुत्थान आहे. त्यांच्या पुढाकाराने सोमनाथ ट्रस्टची स्थापना झाली. प्रसिद्ध स्थापत्यतज्ज्ञ प्रभाशंकर सोमपुरा यांनी मंदिराची रचना केली.
आजचे सोमनाथ मंदिर चालुक्य शैलीत बांधलेले आहे. मंदिराचा शिखरभाग अत्यंत भव्य असून त्यावरील ध्वज दररोज बदलला जातो. समुद्रकिनारी उभे असलेले मंदिर सूर्यास्ताच्या वेळी अतिशय मोहक दिसते.
संध्याकाळची ध्वनी-प्रकाश शोभा आणखी वाढवते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते आणि हिंदू श्रद्धेचे अत्यंत पवित्र केंद्र आहे.
Ans: पौराणिक कथेनुसार चंद्रदेव (सोम) यांनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या करून शापमुक्ती मिळवली. त्यानंतर त्यांनी येथे मंदिर बांधले, त्यामुळे या स्थानाला “सोमनाथ” असे नाव पडले.
Ans: अनेक आक्रमणांनंतरही मंदिर पुन्हा उभे राहिले. त्यामुळे ते भारतीय संस्कृतीच्या जिद्दीचे आणि पुनर्जागरणाचे प्रतीक मानले जाते.