Ind Vs PAk, Asia Cup 2025
क्रिकेट की देशभक्ती? आशिया कप 2025 मध्ये भारत-पाक सामना वादग्रस्त
भारत-पाक सामना : देशभक्ती फक्त घोषणांपुरतीच?
क्रिकेटमध्ये राजकारण की राजकारणात क्रिकेट? आशिया कपने उभे केले प्रश्न
क्रिकेटला नेहमीच “जेंटलमेनचा खेळ” म्हटलं जातं. परंतु गेल्या काही वर्षांत या खेळातही राजकारणाची पिसं लावली गेली आहेत. Asia Cup 2025 चं उदाहरण घ्या – मैदानावर खेळ सुरू असला तरी त्यामागे राजकीय वादळ उठलेलं दिसतं.
भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळावं का, हा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात निरपराध नागरिक ठार झाले – या घटनांनंतर जनतेच्या भावना ढवळून निघाल्या. “बॉयकॉट पाकिस्तान”च्या घोषणा दिल्या गेल्या. देशभक्तीच्या नावाखाली मोठमोठ्या गप्पा मारल्या गेल्या. पण शेवटी सरकारने परवानगी देऊन सामना खेळवला. मग प्रश्न असा निर्माण होतो की, जर खेळायचंच होतं तर देशभक्तीचं राजकारण का केलं गेलं?
काहींसाठी क्रिकेट हे फक्त एक खेळ आहे, पण अनेक भारतीयांसाठी ते अभिमान आणि भावना आहेत. जेव्हा आपल्या भगिनींवर हल्ले होतात, निरपराध नागरिकांना ठार केलं जातं, तेव्हा मनात स्वाभाविकच संताप निर्माण होतो. त्याच वेळी दुसऱ्या देशाशी खेळण्याचा निर्णय घेतला जातो, तेव्हा “देश की क्रिकेट?” हा प्रश्न अधिक तीव्रतेने उभा राहतो.
आपल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल? त्यांचा त्याग, त्यांचं दु:ख बाजूला ठेऊन, फक्त पैशासाठी किंवा आंतरराष्ट्रीय दबावामुळे सामना खेळवला जातो का? मग देशभक्ती फक्त जनतेला भावनिक बनवण्यासाठी आहे का?
क्रिकेट आणि राजकारण हे दोन वेगळे विषय आहेत. खेळात राजकारण नसावं आणि राजकारणात खेळ नसावा, पण वास्तव मात्र अगदी उलट आहे. खेळ हे मैत्री आणि सौहार्द वाढवण्यासाठी असतात. परंतु जेव्हा तोच खेळ दहशतवादी पार्श्वभूमी असलेल्या देशाशी खेळला जातो, तेव्हा तो फक्त क्रिकेट राहत नाही. तो एक राजकीय संदेश ठरतो.
शेवटी प्रश्न एकच आहे – देश मोठा की क्रिकेट? देशभक्ती फक्त घोषणांपुरती ठेवायची का, की खऱ्या अर्थाने आचरणात आणायची? जनता आज याचं उत्तर शोधते आहे