
Monsoon Bike (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पावसाळ्यात अनेकजण बाईक राइडचा विचार करतात.
मस्त पावसात बाईक चालवण्याचा काही वेगळाच अनुभव असतो
परंतू पावसात काही चालवण्याच्या आधी ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा..
पावसाळा सुरु झाला की वातावरणात आल्हाददायक होतं, पण दुचाकी चालवणाऱ्यांसाठी हा काळ तितकाच धोकादायकही असतो. रस्त्यावर चिखल, पाणी, खड्डे आणि कमी दिसणारा मार्ग यामुळे छोट्याशा चुकीचाही मोठा फटका बसू शकतो. रोज ऑफिस, कॉलेज किंवा इतर कामासाठी बाईक किंवा स्कूटर वापरणाऱ्यांनी या दिवसांत थोडी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. काही सध्या सवयी अंगीकारल्या तर पावसातील प्रवास अधिक सुरक्षित आणि निर्धास्त होऊ शकतो.
टायर व्यवस्थित आहेत का, याची खात्री…
सर्वात आधी लक्ष द्यायचं ते म्हणजे दुचाकीच्या टायरकडे. टायरची पकड चांगली नसेल तर ओल्या रस्त्यावर गाडी सहज घसरू शकते. टायर जास्त झिजले असतील किंवा त्यात योग्य प्रमाणात हवा नसेल, तर वाहनावर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वी टायर व्यवस्थित आहेत का, याची खात्री करून घ्या. गरज वाटल्यास वेळ न दवडता नवीन टायर बसवणे हा चांगला निर्णय ठरू शकतो.
दोन्ही ब्रेकचा योग्य वापर केल्यास वाहनावर संतुलन टिकते
ब्रेक ही दुचाकीची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पावसात ब्रेक योग्य प्रकारे काम करत नसतील तर अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे ब्रेकमध्ये काही अडचण वाटत असेल तर लगेच मेकॅनिककडून तपासणी करून घ्या. गाडी चालवताना अचानक जोरात ब्रेक दाबण्याऐवजी हळूहळू वेग कमी करा. पुढील आणि मागील दोन्ही ब्रेकचा योग्य वापर केल्यास वाहनावर संतुलन टिकवणे सोपे जाते.
Monsoon Bike Care : पावसात बाईक ठेवायची ब्रेकडाउन-फ्री? या टिप्स …
ओल्या रस्त्यावर गाडी हळू चालवा…
पावसाळ्यात वेगावर नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक आहे. अनेकजण रिकामा रस्ता पाहून गाडी वेगात चालवतात, पण ओल्या रस्त्यावर असा निर्णय धोकादायक ठरू शकतो. वाहन जितकं कमी वेगात असेल तितकं ते नियंत्रित करणं सोपं असतं. पुढे अचानक एखादा खड्डा, पादचारी किंवा दुसरं वाहन आल्यास वेळेत गाडी थांबवता येते. त्यामुळे नेहमी संयमाने आणि सुरक्षित वेगात प्रवास करा.
उठून दिसणाऱ्या रंगाचा रेनकोट किंवा परावर्तित पट्टे असलेले कपडे वापरा…
पावसात अनेकदा समोरचा रस्ता नीट दिसत नाही. धुकं, पावसाचे थेंब आणि कमी प्रकाश यामुळे दृष्टी कमी होते. अशा वेळी दुचाकीचे दिवे सुरू ठेवणं फायदेशीर ठरतं. हेल्मेटची काच स्वच्छ असणंही तितकंच गरजेचं आहे. घाण किंवा धुक्यामुळे दृष्टी अडल्यास अपघाताचा धोका वाढतो. शक्य असल्यास उठून दिसणाऱ्या रंगाचा रेनकोट किंवा परावर्तित पट्टे असलेले कपडे वापरा. त्यामुळे इतर वाहनचालकांनाही तुमची उपस्थिती लवकर लक्षात येते.
पाणी भरलेल्या भागातून जाताना गाडी अगदी सावकाश चालवा…
रस्त्यावर पाणी साचलेलं दिसलं की अनेकजण अंदाजाने गाडी पुढे नेतात. मात्र अशा पाण्याखाली मोठे खड्डे किंवा उघडी गटारे असू शकतात. त्यामुळे पाणी भरलेल्या भागातून जाताना गाडी अगदी सावकाश चालवा. शक्य असेल तर अशा रस्त्यांना पर्याय निवडा. पाण्यात गाडी बंद पडल्यास इंजिनचं नुकसान होण्याची शक्यता देखील असते.
दुचाकीची संपूर्ण तपासणी करून घेणं फायदेशीर…
पावसाळ्यापूर्वी एकदा दुचाकीची संपूर्ण तपासणी करून घेणं फायदेशीर ठरतं. बॅटरी, लाईट्स, हॉर्न, इंडिकेटर, चेन आणि इतर भाग व्यवस्थित आहेत का, हे पाहून घ्या. पावसात भिजल्यानंतर वाहन स्वच्छ करून कोरडं करणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे गंज लागत नाही आणि वाहनाचं आयुष्य वाढतं. चेनला वेळोवेळी तेल लावल्यास तिचं काम सुरळीत सुरू राहतं.
चप्पल किंवा घसरडे सँडल वापरल्यास पाय घसरू शकतो…
दुचाकी चालवताना सुरक्षिततेची सुरुवात हेल्मेटपासूनच होते. फक्त नियम म्हणून नाही, तर स्वतःच्या सुरक्षेसाठी चांगल्या दर्जाचं पूर्ण चेहरा झाकणारं हेल्मेट वापरा. यासोबत हातमोजे आणि मजबूत बूट घातल्यास पावसात गाडी चालवणं अधिक सुरक्षित होतं. चप्पल किंवा घसरडे सँडल वापरल्यास पाय घसरू शकतो आणि वाहनावरचं नियंत्रण सुटू शकतं.
Bike Knowledge: पावसामध्ये बाईक किती स्पीडमध्ये चालवावी …
मोठ्या वाहनांच्या अगदी जवळ जाणं टाळा
पावसात रस्त्यावर इतर वाहनचालकांकडूनही चुका होऊ शकतात. त्यामुळे स्वतः बरोबर चालवणं पुरेसं नसून इतरांपासून योग्य अंतर ठेवणंही गरजेचं आहे. मोठ्या वाहनांच्या अगदी जवळ जाणं टाळा. त्यांच्या चाकांमधून उडणारं पाणी आणि चिखल दृष्टी अडवू शकतो. शिवाय अचानक ब्रेक लागल्यास धडक होण्याची शक्यता वाढते.
पावसाळ्यातील प्रवास थोडा अवघड असला तरी योग्य काळजी घेतली तर तो नक्कीच सुरक्षित होऊ शकतो. वाहनाची नियमित देखभाल, मर्यादित वेग, योग्य सुरक्षासाहित्य आणि सतर्कपणे वाहन चालवण्याची सवय या काही साध्या गोष्टी तुमचा प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित आणि निर्धास्त बनवू शकतात. सुरक्षित प्रवास हीच खरी शहाणपणाची सवय आहे.