माले : मालदिव आणि भारत यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान, मालदिवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी रविवारी पुन्हा एकदा ‘इंडिया आउट’चा नारा दिला आहे. मोहम्मद मुइज्जू यांनी भारताने मालदीवमधून आपले सैन्य मागे घ्यावे या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. यासोबतच त्यांनी भारताला 15 मार्चचा अल्टिमेटम दिला आहे. यापूर्वी मालदिवने दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्य हटवण्याची मागणी केली होती.
सरकारी आकडेवारीनुसार, मालद्वमध्ये 88 भारतीय सैनिक आहेत. नुकत्याच चीनच्या दौऱ्यानंतर मायदेशी परतलेले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आता भारताबाबत सातत्याने टोकदार विधाने करत आहेत.
कोअर ग्रुपची चर्चा
सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी मालदीव आणि भारताने उच्चस्तरीय कोअर ग्रुप तयार केला आहे. रविवारी या गटाची माले येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात पहिली बैठक झाली. या बैठकीला भारतीय उच्चायुक्त मुनू महावरही उपस्थित होते. भारतीय सेना मालदीवमध्ये राहू शकत नाही हे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझू सरकारचे धोरण आहे, असे मुइझू यांचे कार्यालयातील सार्वजनिक धोरण सचिव अब्दुल्ला नाजीम इब्राहिम यांनी सांगितले आहे.






