
भारतामध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढतेय, जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांच्या व्यवस्थापनाचा प्रश्नही गंभीर बनत आहे. यासाठी केंद्र सरकारने वाहन स्क्रॅपिंग धोरण लागू केलं आहे. या धोरणामुळे जुन्या वाहनांची सुरक्षित विल्हेवाट लावणं आणि त्यातील साहित्याचा पुनर्वापर करणं शक्य होत आहे.
साधारणपणे १५ ते २० वर्षे जुनी झालेली किंवा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य ठरलेली कार स्क्रॅप करण्यासाठी वाहनमालकाने अधिकृत वाहन स्क्रॅपिंग केंद्राशी संपर्क साधावा लागतो. वाहनाची नोंदणी, आरसी बुक, ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर वाहन स्क्रॅपिंग प्रक्रियेसाठी स्वीकारलं जातं. त्यानंतर वाहनातील इंधन, इंजिन ऑईल, कुलंट, बॅटरी यांसारखे पर्यावरणाला हानी पोहोचवू शकणारे घटक सुरक्षितपणे वेगळे केले जातात.
Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा …
यानंतर कारचे विविध भाग वेगळे करण्याची प्रक्रिया सुरू होते. इंजिन, गिअरबॉक्स, टायर, काच, प्लास्टिकचे भाग आणि धातूचे भाग वेगवेगळे केले जातात. वापरण्यायोग्य सुटे भाग दुरुस्त करून पुन्हा बाजारात विकले जाऊ शकतात. उर्वरित वाहन मोठ्या यंत्रांच्या साहाय्याने चिरडून त्यातील धातू वेगळे काढले जातात.
स्क्रॅप झालेल्या कारमधील सुमारे ७५ ते ८० टक्के साहित्याचा पुनर्वापर होऊ शकतो. लोखंड आणि स्टील वितळवून नव्या वाहनांच्या निर्मितीत किंवा इतर औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरले जाते. अॅल्युमिनियम आणि तांबे यांसारख्या धातूंचाही पुनर्वापर केला जाऊ शकतो. प्लास्टिकचे भाग प्रक्रिया करून नवीन प्लास्टिक उत्पादनं तयार करण्यासाठी वापरले जातात. काही विशेष प्रकारच्या काचांचेही पुनर्चक्रण करणे शक्य असते.
जुनी कार करा स्क्रॅप, नव्या कारवर मिळवा ५% सूट; असा घ्या सरकारी …
वाहन स्क्रॅपिंगमुळे केवळ कचरा कमी होत नाही, तर नैसर्गिक संसाधनांची बचत आणि ऊर्जा संवर्धनही होते. नवीन धातू खाणीतून काढण्यापेक्षा पुनर्चक्रित धातू वापरणे अधिक फायदेशीर आणि पर्यावरणपूरक ठरते. त्यामुळे वाहन स्क्रॅपिंग ही केवळ जुन्या कारची विल्हेवाट नसून शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.