आजकाल नाटकांचे विषय हे बहुतेक नवरा – बायको आणि लग्नानंतरची प्रकरणे किंवा लफडी किंवा वादविवाद यावर आधारित आहेत. सध्या व्यावसायिक रंगभूमीवर सुरू असलेल्या नाटकातील ७५ टक्के नाटकांचे आशय हे त्यावरच अवलंबून आहेत. काहीदा त्याभोवतीच मांडलेले दिसतात. एकेकाळी कौटुंबिक विषयांची ‘चलती’ ही बुकींग ऑफीसवर असायची पण बदलत्या काळात लग्नानंतरची ‘लफडी’ रंगभूमीवर गाजत आहेत. नवा रसिकराजा त्याकडे ओढला जात असल्याचे दिसून येतेय. समाजजीवनाचं प्रतिबिंब अथवा पडसाद हे नाटकांच्या संहितांवर पडतात खरे, त्यावर नाट्यअभ्यासकांनी गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलीय. असो.
नाशिकचे सागर देशमुख यांचे लेखन, दिग्दर्शन असलेले नाटक ‘किरकोळ नवरे’. अगदी टायटलपासूनच नवऱ्याला ‘किरकोळ’ गृहित इथे धरण्यात आलय. निर्माते दिनू पेडणेकर या निर्मितीमागे ठामपणे उभे आहेत. प्रयोग जोरात सुरू केलेत. दुसरं नाटक ‘खरं खरं सांग!’ जे नीरज शिरवईकर यांचे लिखाण आहे तर विजय केंकरे यांचं दिग्दर्शन. दोघांचा सस्पेन्स, थ्रिलर नाटकापासून जरा हटके हा नवरा – बायकोचा ‘खर खरं सांग!’ हा विषय. अनेक पूरस्कार यंदाच्या वर्षात या नाटकाने पटकविले. आणखीन एक नाटक ‘नियम व अटी लागू’ ज्याची संहिता संकर्षण कऱ्हाडे यांची तर चंद्रकांत कुलकर्णी याचे दिग्दर्शन आहे. प्रशांत दामले ग्रूपची ही निर्मिती. म्हणजे अर्थातच प्रयोगांवर प्रयोग होणारच. ते होतही आहेत. आता तर हे नाटक परदेश दौऱ्यावरही निघालय. खूद्द प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांची प्रमुख भूमिका असलेले ‘सारखं काहीतरी होतंय!’ हे नाटक. जे याच ‘लफडी’ मालिकेतले आहे. जे अनेक कारणांनी गर्दी खेचतय. त्यातही धम्माल आहेच. अद्वैत दादरकर याची संहिता व दिग्दर्शन असलेले ‘एका लग्नाची पुढची गोष्ट!’ यातही ‘पुढची गोष्ट’ आहे.
मनस्विनी लता रवींद्र यांचे नाटक, ज्याचं दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केलंय. जे टायटलपासूनच विचार करायला लावतय. खाण्यापिण्याचं ‘डाएट’ पाळणारी आपली नवीन संस्कृती. त्यात ‘लग्न’ ही पोहचलय. ‘डाएट लग्न’ हे नाटक. जे देखिल याच वाटेवरून जातय आणि आणखीन एक नाटक. जे चक्क ३१ वर्षापूर्वी रंगभूमीवर गाजलं. त्याची दुसरी ‘इनिंग’ सुरु झालीय. नव्या संचातला प्रयोग चर्चेत आहे. ते नाटक मध्ये प्रशांत दळवी यांचं ‘चारचौघी’. जे गर्दी खेचतय. लग्न न करता मुलींना जन्म देणारी आई ! त्यात आहे. विवाह संदर्भातला नैतिकतेच्या साऱ्या संकल्पनांचे वाभाडे त्यात काढले आहेत.
‘किरकोळ नवरे’ या नाटकात एकाच वेळी एका बायकोचे दोन नवरे हजर असतात. एक बेडरूममध्ये आणि दुसरा हाॅलमध्ये कोचावर रात्री झोपतो. अशा वनलाईनवर हे नाटक बांधलं आहे. ‘आजी’ आणि ‘माजी’ नवऱ्यांची ही गोष्ट. प्रौढांसाठीचा विषय पण त्याला मस्त विनोदाची फोडणी दिली आहे. ‘नवरा – बायको’ या नाजूक संबंधावरलं हे नाटक असलं तरी योगायोगाने कुठली फट्फजिती उडते यावर नाट्य रंगलं आहे. सागर देशमुख, पुष्पराज चिरपुटकर आणि अनिता दाते या तिघा कलाकारांनी ही नव्या नात्याची आजी – माजी लफडी ताकदीने पेश केलीय. तसा बोल्ड विषय पण ‘सिरियल’चा सराव झाल्याने रसिकांच्या अंगवळणी पडली आहेत. नाहीतर ‘नवरे हक्क समिती’ने प्रसंगी आंदोलनही केले असते! ‘सेंसॉर’नेही या संहितेला ‘प्रौढांसाठी’ नव्हे तर ‘सर्वांसाठी’ असे प्रमाणपत्र दिलय. अर्थात सारा बदलत्या वातावरणाचा परिणाम!
‘खरं खरं सांग’ हे नाटक. जे फ्रेंच नाटककार फ्लाॅरियन झेलर यांच्या तुफान गाजलेल्या ‘द ट्रूथ’ या नाटकावर आधारित आहे. ‘विवाहबाह्य संबंधातला सेक्स’ हा विषय. आणि त्या संबंधाबद्दल आजच्या पिढीला काही गैर वाटत नाही. नवरा – बायको आणि त्यांची अफेअर! अर्थात फ्रेंच नाटककार असल्याने सारं काही तिथं ‘खरं खरं चालत’जरी असलं तरी आपण विचार करतो. असो. तर हे नाटकही ‘लफडीप्रधान’ आहे. ज्याला तरुणवर्गाची गर्दी होतेय. विनोदवीर आनंद इंगळे यात धम्माल करतोय. विनोदी भूमिकेसाठी पुरस्कारही घेतोय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अनुदानासाठी शंभर टक्के पात्र नाटक सिद्ध झालय! आता बोला! कालाय तस्मै नमः!!
‘नियम अटी लागू’ हे देखिल याच वाटेवरलं. तस विनोदी नाटक पण गंभीर विषय. नवरा – बायकोचं लग्न जरी झालं तरी मानसिक – शारीरिक दृष्ट्या जमलेलं नाही. ‘करियर की संसार!’ हा प्रश्न त्यांच्यात आहे. अखेर दोघांची भांडणे कळसापर्यंत पोहचतात. घटस्फोटापर्यंत प्रकरण जाते. दरम्यान एका मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला जातो. संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख, प्रसाद बर्वे या तिघांनी हे नाट्य खिळवून ठेवलय. तरुणाईच्या भावभावना त्यातून प्रगटतात. यात असलेला सदा अतिरेककर प्रमाणेच ‘डाएट लग्न’ यातही तरुणी मानसोपचार आहे. ही किंवा अशी प्रकरणे सोडविण्यासाठी तज्ञांकडे सोपविण्यात येतात. पूर्वी घरातली वडीलधारी मंडळी ही यातून मार्ग सूचवायचे. पण आता एकत्र कुटुंबपद्धती संपली आणि हा नवा पर्याय नव्या पिढी पुढे उभा ठाकला आहे. हे नजरेत भरत.
‘डाएट लग्न’ हे नाटक सुद्धा लग्नानंतरच्या नवरा – बायकोच्या नातेसंबंधावर आधारित. यात दोघांचं लग्न होतं खर पण दोघांमध्ये सतत भांडण होतात. दोघांच्या चुकाही होतात. त्या सुधारण्याचा प्रयत्न होतो खरा पण बरेचदा हे जमतही नाही. यावर उपाय करण्यासाठी एका सायको थेरपिस्टची भेट घेतली जाते. ती या नवऱ्याची एकेकाळची मैत्रीण असते. बिघडलेलं हे नातं जमविण्यासाठी महिनाभर एकमेकांशी फार काही बोलायचं नाही. ‘संबंध’ ठेवायचे नाहीत. स्वतंत्रपणे राहायचं – असा उपाय सांगते. पुढे घोळात घोळ. नवरा – बायको नाजून नात्यात कोण नंबर वन यातील चढाओढही असते. ‘मिसमॅच’ असलेले दांपत्य आणि लग्नानंतरचा एक गंभीर प्रश्न यातून मांडण्यात आलाय.
‘हाऊसफुल्लसम्राट’ प्रशांत दामले याचं ‘सारखं काहीतरी होतय’ हे नाटक. त्यातही बायकोनंतरचं जगणं प्रकाशात येतय. त्यात हिरो करीत असलेली लपवाछपवी आहे. जूनी मैत्रीण घरात आणतो आणि दोघेमिळून मुलीसमोर नाटकात नाटक खेळतात. प्रशांत आणि वर्षा – या दोघांनी आपल वय ‘लाॅक’ केल्यागत झालय. जरी वयाने प्रौढ असले तरी तरुणांना ते आपलेच वाटतात. महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही या नाटकाने त्यातील बिनधास्त – विनोदी आशयामुळे अनेक ‘रिपीट शो’ मिळविले आहेत.
विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडल्यावर त्याच्याशी प्रामाणिक राहून प्रेमापोटी तीन मुलींना वाढविणारी आई ही ‘चारचौघी’ नाटकात दिसते. पुरुषप्रधान संस्कृतीचे दर्शन यात घडतेय. ३१ वर्षापूर्वीचं नाटक हे आजही आजचं वाटतंय. एक जळजळीत अनुभव हा या चौघीजणी या नाटकातून देतात. प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी या दोघांची ही नाट्यकृती तशी बेधडक पण आजही विचार करायला लावणारी ठरते. नव्या टिममध्ये – रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर यांची हजेरी रंगभूमीवर आहे. या नव्या नाट्यप्रवाहात हे नाट्य आजही डोळ्यात अंजन घालणारे ठरते तसेच अस्वस्थ करून सोडते. ३१ वर्षांपूर्वी जरा ‘बोल्ड’ वाटणारा विषय आज ‘कोल्ड’ म्हणजे नेहमीच बनलाय!
‘आम्ही नट म्हणजे नुसते लमाण, इकडच्या माल तिकडे नेऊन टाकणारे’ असे. ‘नटसम्राट’ नाटकात जेष्ठ नाटककार वि. वा शिरवाडकर यांनी म्हटलंय. ते शंभर टक्के सत्य आहे. नटाअगोदर नाटककार म्हणजे देखिल ‘लमाण’च आहेत. समाजात, कुटुंबात घडणाऱ्या घटना इकडून तिकडे नेऊन टाकणारे! घटस्फोटांच्या घटना, लग्नाला पर्याय असलेले लिव्ह अँड रिलेशन्स, सिंगल मदर, नाईट आऊट, डेट्स या वाढत्या प्रकरणांचा पडसाद हा मराठी नाटकांच्या विषयात डोकावतो आहे. ‘दिवाणखान्याच्या चौकटीतून मराठी नाटक कधी बाहेर पडणार काय?’ असा सवाल पूर्वी हमखास विचारला जात होता. त्यात बदल करून लग्नानंतरची लफडी या चौकटीतून मराठी नाटक कधी व कसे सुखरूप बाहेर पडेल? हा नवा प्रश्न रसिकराजांनी विचारला तर तो जराही गैर ठरणार नाही!
– संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com