
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एडीएम (न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज : एडीएम ) या नैसर्गिक स्रोतांवर आधारित नाविन्यपूर्ण उपाययोजनांमध्ये जागतिक अग्रणी असलेल्या कंपनीने आज जाहीर केले की, भारतातील महाराष्ट्र राज्यातील १५,००० नव्या सोयाबीन शेतकऱ्यांमध्ये पुनरुत्पादक शेती पद्धतींचा प्रसार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था टेक्नोसर्व्ह सोबत नव्या भागीदारीअंतर्गत ५ लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. हा उपक्रम कंपनीच्या “फार्म फॉरवर्ड” मोहिमेचा एक भाग आहे.
कंपनीच्या सामाजिक गुंतवणूक विभाग असलेल्या “एडीएम केअर्स”च्या निधीतून राबविण्यात येणारा हा १८ महिन्यांचा स्थानिक उपक्रम महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव, बीड आणि नांदेड या चार जिल्ह्यांत कार्यान्वित केला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जमिनीची सुपीकता व मृदास्वास्थ्य सुधारणा, शेतकरी उत्पादक संस्थांना (एफपीओ) सक्षम करणे, तसेच डिजिटल मार्गदर्शन साधने आणि शासकीय योजनांपर्यंत शेतकऱ्यांचा अधिक व्यापक प्रवेश वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
या भागीदारीला सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करून औपचारिक मान्यता देण्यात आली असून, मे २०२६ पासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या अंतर्गत एडीएमकडून धोरणात्मक दिशा, प्रशासन व देखरेख पुरविण्यात येईल, तर टेक्नोसर्व्ह प्रत्यक्ष क्षेत्रीय अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळणार आहे.
शाश्वत शेतीच्या प्राधान्यक्रमांशी सुसंगत असलेल्या या उपक्रमांतर्गत रासायनिक घटकांवरील अवलंबित्व कमी करणे आणि पुनरुत्पादक शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे. पर्यावरणीय फायद्यांपलीकडे जाऊन, सहभागी शेतकऱ्यांच्या उपजीविकेत दीर्घकालीन सुधारणा घडवून आणणे हा देखील या कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. अधिक सातत्यपूर्ण उत्पादन आणि खर्चातील कार्यक्षमता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. शाश्वत शेती पद्धतींमुळे प्रत्यक्ष आर्थिक प्रगती साध्य होऊ शकते, असा मार्ग हा उपक्रम निर्माण करीत असून, त्यामुळे प्रदेशातील कृषी पुरवठा साखळी अधिक सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह बनण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात जमिनीची सुपीकता आणि पाण्याची स्थिती यांचे सविस्तर मूल्यमापन करण्याच्या प्रारंभिक टप्प्यापासून होणार आहे. यासाठी शासनाच्या विद्यमान तंत्रज्ञान आधारित उपाययोजनांचा वापर केला जाणार आहे. या अभ्यासाच्या आधारे शेतकऱ्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार सुसंगत कृषी मार्गदर्शन दिले जाईल, ज्यामुळे अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल. या पायाभूत कार्यानंतर दोन पीक हंगामांदरम्यान कार्यक्रमातील गावांमध्ये सुमारे २०० प्रात्यक्षिक प्लॉट उभारले जाणार आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना मृदास्वास्थ्य सुधारणा, जलसंधारण आणि दीर्घकालीन उत्पादकता वाढविणाऱ्या शेती पद्धती प्रत्यक्ष पाहता आणि स्वीकारता येतील. कार्यक्रमाचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहावा यासाठी सुमारे आठ शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापन करण्यात येणार असून, त्या ग्रामीण कृषी विकासाच्या केंद्रांप्रमाणे कार्य करतील.
या कार्यक्रमाअंतर्गत डिजिटल कृषी उपाययोजनांचे शासनाच्या विविध योजनांशी एकत्रीकरण करण्यालाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या “महा-अॅग्री टेक” प्रकल्पाचाही समावेश आहे. अचूक शेती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी हा राज्यस्तरीय उपक्रम राबविण्यात येत आहे. उपग्रह आधारित माहिती आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकांची स्थिती, कीड प्रादुर्भाव आणि शेतातील परिस्थितीविषयी माहिती आधारित मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे शेतपातळीवर अधिक वेळेवर आणि योग्य निर्णय घेणे शक्य होणार आहे. तसेच खते आणि पीक संरक्षण उत्पादनांचा अधिक अचूक व कार्यक्षम वापर करण्यास मदत मिळेल. यासोबतच “महाविस्तार” अॅपसारख्या सल्लागार व्यासपीठांशी शेतकऱ्यांना जोडले जाईल, ज्याद्वारे त्यांना तात्काळ आणि वैयक्तिक कृषी मार्गदर्शन उपलब्ध होईल.
या भागीदारीविषयी बोलताना अमरेंद्र मिश्रा म्हणाले, “एडीएममध्ये आम्ही मानतो की शाश्वत पुरवठा साखळीची सुरुवात सक्षम आणि तग धरणाऱ्या शेतकरी समुदायांपासून होते. टेक्नोसर्व्ह सोबतच्या भागीदारीतून आम्ही जागतिक ‘फार्म फॉरवर्ड’ उपक्रमांतर्गत २०२६ साठी एडीएमचा एपीएसी प्रमुख कार्यक्रम राबवत आहोत. आमचे कौशल्य, भागीदारी आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांच्या एकत्रित बळावर हवामान बदलासमोरील शेतकऱ्यांची क्षमता वाढविणे, मृदास्वास्थ्य सुधारणे आणि लक्षित प्रशिक्षण व तंत्रज्ञान आधारित उपाययोजनांच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावणे हा आमचा उद्देश आहे.”
टेक्नोसर्व्ह (TechnoServe) इंडियाचे कंट्री डायरेक्टर जॉयदीप दत्त म्हणाले: “आमचा असा ठाम विश्वास आहे की, कृषी क्षेत्रात शाश्वत परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्या अन्न-प्रणालीचा कणा असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सक्षमीकरण होणे अनिवार्य आहे. ADM सोबतच्या भागीदारीतून, आम्ही आमचे क्षेत्रीय कसब आणि समुदायाशी असलेले दृढ संबंध यांच्या जोडीने महाराष्ट्रातील अल्पभूधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम बनवत आहोत. याद्वारे हवामान बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता (climate resilience) निर्माण करणे आणि पुनरुत्पादक शेतीचा अवलंब करणे, यावर आमचा भर आहे. शेतकऱ्यांची उपजीविका अधिक समृद्ध करून माणूस आणि निसर्ग या दोन्ही घटकांसाठी हितकारक ठरेल अशी कृषी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या भागीदारीच्या माध्यमातून एडीएम आणि टेक्नोसर्व्ह भारतात पुनरुत्पादक शेतीला चालना देण्यासाठी विस्तारक्षम आदर्श मॉडेल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत. मूल्यसाखळीतील विविध घटकांमधील सहकार्यामुळे शेतपातळीवर अर्थपूर्ण प्रगती साधता येते, हवामान बदलासमोरील क्षमता अधिक मजबूत होते आणि शाश्वत उपजीविकेला पाठबळ मिळते, हे या उपक्रमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिसलेरीचा पुढाकार; महाराष्ट्र-गोव्यात ४० हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग