
(फोटो सौजन्य: pinterest)
Debt Vs Investment : प्रत्येक व्यक्तीला अनेकदा बऱ्याच मोठ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. जेव्हा सगळ्या आयुष्यातल्या गोष्टींवर खर्च करुन होतो त्यानंतर हाती राहिलेल्या अतिरिक्त रकमेचं काय करावं असा प्रश्न पडतो. तेव्हा त्यांनी त्या पैशांचा वापर कर्ज फेडण्यासाठी करावा की भविष्यासाठी गुंतवणूक करावी? अनेकांचा असा समज असतो की, कर्ज जितक्या लवकर फेडले जाईल, तितके ते अधिक महत्त्वाचं असते. याउलट, काही व्यक्ती डोक्यावर कर्ज असतानाही आपली गुंतवणूक मात्र सुरूच ठेवतात. वास्तविक पाहता, या प्रश्नाचे असे कोणतेही एकच निश्चित उत्तर नाही. योग्य निर्णय हा तुमच्या कर्जाचा व्याजदर आणि तुमची वैयक्तिक जोखीम घेण्याची क्षमता यांवर अवलंबून असतो. नेमकं काय कमी जास्त होऊ शकतं समजून घेऊयात.
पूर्वजांचे पैसे बँक किंवा विम्यात तसेच पडून आहेत? ‘अशी’ ट्रान्सफर करा बँक खात्यात हक्काची रक्कम
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्या कर्जावर लागू असलेला व्याजदर आणि तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारा अपेक्षित परतावा यांचे मूल्यमापन करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, असे गृहीत धरा की तुमच्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर १४% आहे, तर तुमच्या गुंतवणुकीवर १०-१२% परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, कर्ज फेडण्याला प्राधान्य देणे अधिक फायदेशीर ठरू शकते; कारण कर्जावरील व्याजापोटी वाचणारी रक्कम ही, एक प्रकारे तुम्हाला मिळालेल्या ‘खात्रीशीर परताव्या’च्याच भाग आहे. त्यामुळे त्यावर लक्ष देणं आवश्यक आहे.
क्रेडिट कार्डवरील थकीत रक्कम, वैयक्तिक कर्जे आणि ज्यांचे EMIs महागडे असतात अशी कर्जे यांवर सामान्यतः व्याजदर खूप जास्त असतो. जर अशी कर्जे दीर्घकाळापर्यंत तशीच राहू दिली, तर ती तुमची आर्थिक स्थिरता कमकुवत करू शकतात. त्यामुळे, त्यांची परतफेड लवकरात लवकर केली पाहिजे. यांना महत्त्व देणं फार गरजेचं आहे. अन्यथा ते आपली स्थिती आणखी बिघडवू शकतात.
गृहकर्जासारख्या कर्जांचे व्याजदर कमी असतात. शिवाय, या कर्जांवर करविषयक फायदेही मिळतात. जर तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर ८% असेल आणि तुमच्या गुंतवणुकीमध्ये दीर्घकाळासाठी १२% पर्यंत परतावा देण्याची क्षमता असेल, तर तुम्ही तुमच्या कर्जाचे EMIs भरत असतानाच तुमची गुंतवणूकही सुरू ठेवू शकता.
अनेक लोकांना असे वाटते की, जोपर्यंत त्यांची सर्व थकीत कर्जे पूर्णपणे फेडली जात नाहीत, तोपर्यंत त्यांनी गुंतवणूक करणे टाळावे. मात्र, हा एक गैरसमज आहे. उदाहरणार्थ, अशा एका व्यक्तीचा विचार करा, जी वयाच्या २८ व्या वर्षी गुंतवणूक सुरू करण्याऐवजी, पुढील १० वर्षे केवळ कर्जे फेडण्यातच घालवते. असे केल्याने, ती व्यक्ती ‘चक्रवाढ व्याजाच्या’ प्रचंड फायद्यांना मुकण्याचा धोका पत्करते.
जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या २८ व्या वर्षी दरमहा ₹१५,००० ची ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (SIP) सुरू केली आणि त्यावर सरासरी १२% वार्षिक परतावा मिळवला, तर ३० वर्षांच्या कालावधीत ती व्यक्ती मोठी संपत्ती उभारू शकते. जितक्या लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली जाईल, तितकाच ‘चक्रवाढ व्याजाच्या’ जादूला काम करण्यासाठी अधिक वेळ मिळतो.
सर्वप्रथम, तुमच्या सहा महिन्यांच्या खर्चाएवढा Emergency Fund तयार करा. त्यानंतर, जास्त व्याजदर असलेल्या कर्जांची त्वरित परतफेड करण्यास महत्त्व द्या. त्याच वेळी अगदी ती रक्कम लहान असली तरीही गुंतवणूक करणे सुरूच ठेवा. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे दरमहा ₹३०,००० ची अतिरिक्त रक्कम उपलब्ध असेल, तर तुम्ही त्यातील ₹२०,००० कर्जाच्या परतफेडीसाठी वापरू शकता आणि उर्वरित ₹१०,००० ची SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. यामुळे तुमची गुंतवणुकीची वाटचाल खंडित न होता, तुमचे कर्ज हळूहळू कमी होत जाईल.
कर्जाची परतफेड करणे आणि योग्य वेळी गुंतवणूक करणे या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. जर एखाद्या कर्जाचा व्याजदर जास्त असेल, तर त्याची शक्य तितक्या लवकर परतफेड करणे शहाणपणाचे ठरते. तथापि, केवळ कर्जाची परतफेड करण्याच्या उद्देशाने आपली गुंतवणूक पूर्णपणे थांबवणे, हा आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय मानला जात नाही. सर्वात उत्तम रणनीती म्हणजे, जास्त व्याजदर असलेले कर्ज कमी करणे सुरू ठेवतानाच, आपल्या गुंतवणुकीचा वेगही कायम राखणे.