
Edible Oil Price Hike, Price Hike, Inflation, World War 3, Iran Israel War,
मिळालेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो १३ ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमती कडाडल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे समुद्रमार्गे होणारी वाहतूक आणि पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेतील दरांवर दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात तेलाची मागणी वाढत असतानाच झालेली ही दरवाढ गृहिणींची चिंता वाढवणारी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा तणाव असाच कायम राहिल्यास येणाऱ्या काळात खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
युद्धाच्या पहिल्या आठवड्यातच खाद्यतेलाच्या किमती प्रति लिटर ३ ते ५ रुपयांनी (सुमारे ५%) वाढल्या होत्या. जागतिक तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली,मालवाहतुकीचा खर्च वाढला. परिणामी, सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल आणि मिश्र तेलांच्या किमतीही झपाट्याने वाढल्या. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय मार्गांवरील धोके वाढले असून, मालवाहतुकीच्या खर्चातही लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे देशांतर्गत तेलाच्या किमतीही अचानक वाढल्या आहेत. सूर्यफूल आणि सोयाबीन तेल, तसेच सर्वसामान्य घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पाम तेलाला या महागाईचा सर्वाधिक फटका बसला आहे.
भारताचा खाद्यतेलाचा वापर प्रचंड असतानाही देशांतर्गत उत्पादन लक्षणीयरीत्या कमी आहे. म्हणजेच कर्नाटक हे सूर्यफूल तेलाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्येही त्याचे उत्पादन होते. असतानाही, एवढे उत्पादनही देशाची एकूण मागणी पूर्ण करण्यासाठी अपुरे आहे. यामुळेच भारताला आपल्या गरजेचा मोठा भाग युक्रेन, रशिया, अर्जेंटिना आणि बल्गेरियासारख्या देशांकडून आयात करावा लागतो. सध्याच्या जागतिक युद्धाच्या परिस्थितीमुळे या देशांकडून होणाऱ्या आयातीला खीळ बसली आहे. जेव्हा परदेशातून येणाऱ्या मालाच्या पुरवठ्यात व्यत्यय येतो, तेव्हा देशांतर्गत बाजारात किमती आपोआप वाढतात.
दक्षिण भारतीय राज्यांमध्ये दरवाढीचा हा परिणाम सर्वाधिक जाणवत आहे. युद्ध तीव्र होण्याच्या अवघ्या आठवडाभरापूर्वी किरकोळ बाजारात १६१ रुपये प्रति लिटरने मिळणारे सूर्यफूल तेल आता १६५ रुपयांवर पोहोचले आहे. ही दरवाढ केवळ एका ब्रँडपुरती मर्यादित नसून, बाजारातील सर्वच प्रमुख कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. विशेष म्हणजे, आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या ‘सफोला गोल्ड’सारख्या मिश्र तेलांच्या (Blended Oil) किमतीतही मोठी वाढ झाली आहे.
बाजार तज्ज्ञ आणि व्यापाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, जागतिक स्तरावरील ही परिस्थिती लवकर न सुधारल्यास येत्या काही दिवसांत सूर्यफूल आणि मिश्र तेलांच्या दरात प्रति लिटर १० ते १५ रुपयांची आणखी वाढ होऊ शकते. ऐन सणासुदीच्या काळात तेलाचे भाव गगनाला भिडल्याने सामान्य ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.