
पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी
नाशिक : महाराष्ट्राला देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून ओळखले जात असताना राज्यातील तब्बल ३६ हजार २११ खासगी कंपन्या मागील पाच वर्षांत बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही आकडेवारी समोर आली. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी महाराष्ट्रातील कंपन्यांच्या सध्याच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर केंद्र सरकारने ही माहिती दिली.
राज्यात मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडल्या असल्या तरी त्यामागची नेमकी कारणे काय आहेत, या कंपन्यांमध्ये किती रोजगार उपलब्ध होता आणि कंपन्या बंद पडल्यामुळे किती जणांच्या रोजगारावर परिणाम झाला, याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे राज्याच्या औद्योगिक वातावरणासह स्थानिक रोजगाराच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, मुंबई शहराला कंपन्या बंद पडण्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबईत तब्बल १२ हजार ९ कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात ६ हजार ४३३, ठाण्यात ४ हजार ७०४, नागपुरात १ हजार ४७८, नाशिकमध्ये ८४०, रायगडमध्ये ८२२ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ६५४ कंपन्या बंद पडल्या आहेत.
व्यापार क्षेत्राला सर्वाधिक फटका
क्षेत्रनिहाय आकडेवारी पाहता व्यापार क्षेत्रातील ४ हजार १९६ कंपन्या, बांधकाम क्षेत्रातील २ हजार ३५६ आणि कृषी क्षेत्रातील १ हजार १७८ कंपन्यांचा समावेश आहे. सेवा आणि अन्य क्षेत्रांमध्येही मोठ्या संख्येने कंपन्या बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. दरम्यान, या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील उद्योग, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला.
उद्योग बंद; कामगारांचे काय?
कंपन्या बंद झाल्यानंतर कामगारांना कायदेशीर देणी मिळाली का? भविष्य निर्वाह निधी, उपदान आणि थकीत वेतनाची रक्कम किती कामगारांना मिळाली? प्रभावित कामगारांसाठी विशेष पुनर्वसन योजना आहे का? या प्रश्नांची उत्तरे केंद्राकडून मागण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारने स्पष्ट केले की, खासगी कंपन्यांचे कामकाज बंद झाल्यामुळे प्रभावित झालेल्या कामगारांची माहिती मंत्रालयाकडे राखली जात नाही.
हे सुद्धा वाचा : चाकणमधील उद्योजक आक्रमक; 15 ते 30 दिवसांत एमआयडीसीतील रस्ते दुरुस्तीची मागणी
नवीन उद्योग किती आले, याचे उत्तर कुठे?
नवीन उद्योगांची निर्मिती आणि रोजगारवाढीचे वास्तव काय आहे, याकडेही सरकारचे लक्ष वेधले आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात किती नवीन उद्योग आले? किती नवीन कंपन्या स्थापन झाल्या? किती गुंतवणूक झाली? किती रोजगार निर्माण झाला? बंद झालेल्या कंपन्यांच्या तुलनेत नव्या उद्योगांची संख्या किती असे विचारले असता, त्याचे उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत’ हा दावा फोल असल्याचे म्हटले आहे.
कंपन्या बंद पडल्याने आज राज्यातील लाखो तरुण आपल्या रोजगारापासून वंचित झाले आहेत. मागील पाच वर्षात सत्तेच्या रस्सीखेचीत व्यस्त असलेल्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असून त्याचाच हा परिणाम दिसत आहे. आता तरी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या घोडेबाजारातून बाजूला सरकत राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवेत, हीच अपेक्षा. -रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष.)