
फोटो सौजन्य - Social Media
श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरोच्या वतीने मुंबईत ‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे भव्य आयोजन करण्यात आले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पर्यटन, व्यापार व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात श्रीलंकेच्या प्रवास व पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींसह भारतातील नामवंत टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट्स, माईस (Meetings, Incentives, Conferences and Exhibitions) प्लॅनर्स, कॉर्पोरेट्स, एअरलाईन्स आणि माध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
हा कार्यक्रम दोन्ही देशांतील व्यापारी समुदायांसाठी संवाद, सहकार्य आणि व्यावसायिक संधी निर्माण करणारा ठरला. पर्यटन, व्यापार तसेच डेस्टिनेशन वेडिंगसाठी श्रीलंकेची वाढती लोकप्रियता यावेळी विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आली. सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक वारसा, जैवविविधतेने नटलेली जंगले, साहसी पर्यटन तसेच योग-वेलनेस सुविधांमुळे श्रीलंका भारतीय पर्यटकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र दिसून आले.
२०२५ हे वर्ष श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्रासाठी विक्रमी ठरले. या वर्षात तब्बल २३.६ लाख परदेशी पर्यटकांनी श्रीलंकेला भेट दिली, जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये भारत आघाडीवर असून ५.३१ लाखांहून अधिक भारतीय पर्यटकांनी श्रीलंकेचा प्रवास केला आहे. एकूण पर्यटकांपैकी सुमारे २७ टक्के वाटा भारताचा असून, हे प्रमाण इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत दुप्पट आहे. भारत–श्रीलंका यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नातेसंबंध, सुधारलेली विमानसेवा आणि प्रभावी मार्केटिंग धोरणे यामुळे ही वाढ शक्य झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात भारत व श्रीलंकेच्या राष्ट्रगीतांनी आणि पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरो आणि श्रीलंका एअरलाईन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्राला पुन्हा उभारी देण्यात भारताचा मोलाचा वाटा आहे. वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करून श्रीलंका एअरलाईन्ससह भारतीय विमान कंपन्यांनी मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथून उड्डाणांची संख्या वाढवली आहे.
श्रीलंकेच्या पारंपरिक नृत्य व संगीत सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. समारोपाच्या वेळी आयोजित स्नेहमेळावा आणि शानदार जेवणामुळे उपस्थितांना परस्पर संवाद साधण्याची व सहकार्याच्या नव्या शक्यता शोधण्याची संधी मिळाली. ‘राफल ड्रॉ’मुळे संध्याकाळ आणखी उत्साही ठरली.
भारत ही श्रीलंकेसाठी सर्वात महत्त्वाची पर्यटन बाजारपेठ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. याच पार्श्वभूमीवर, २०२६ पर्यंत ३० लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्दिष्टाने भारतासोबतची भागीदारी अधिक बळकट करण्याचा निर्धार श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरोने व्यक्त केला आहे. कौटुंबिक सहलींसोबतच कॉर्पोरेट कार्यक्रम, विवाहसोहळे आणि अनुभवाधारित पर्यटनासाठी श्रीलंकेला अग्रगण्य गंतव्यस्थळ म्हणून सादर करण्यावर भर देण्यात येणार आहे.