भारतीय उद्योजकतेचा जागतिक डंका!
ही केस स्टडी तौरल इंडियाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या उच्च-प्रिसिजन ॲल्युमिनियम कास्टिंग व्यवसायाच्या प्रवासावर आधारित आहे. जर्मनीस्थित थोनी आलुटेक या कंपनीसोबतच्या संयुक्त उपक्रमातून २०१६ साली सुरू झालेल्या या प्रवासाचा मागोवा या अभ्यासात घेण्यात आला आहे. ऊर्जा, रेल्वे, संरक्षण आणि एरोस्पेस यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना सेवा देणाऱ्या जागतिक स्तरावरील उत्पादन व्यासपीठापर्यंत झालेल्या कंपनीच्या प्रगतीचा यात समावेश आहे.
हार्वर्ड बिझनेस स्कुल येथील वरिष्ठ प्राध्यापक व्ही. जी. नारायणन यांनी ही केस स्टडी तयार केली असून, मुंबईतील हॉटेल ताज लँड्स एन्ड येथे मंगळवारी त्यांनी या केस स्टडीचे सादरीकरण केले. भरत गीते व माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह उद्योग, शिक्षण व धोरणात्मक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. परंपरागत औद्योगिक पार्श्वभूमी किंवा नेटवर्क नसतानाही पहिल्या पिढीतील उद्योजक जागतिक स्तरावरील उद्योग कसा उभारू शकतात, याबाबतचे विश्लेषण प्रा. व्ही. जी. नारायणन यांनी यामधून मांडले आहे.
प्रा. व्ही. जी. नारायणन म्हणाले, “तौरल इंडियाचा प्रवास उदयोन्मुख बाजारपेठेत उत्पादन क्षमता उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांवर केंद्रित आहे. जागतिक सहकार्य, उच्च तंत्रज्ञान आणि स्थानिक अंमलबजावणी यांच्या संगमातून सक्षम व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उद्योग कसा उभा राहू शकतो, याचे हे उदाहरण आहे. ‘तौराल इंडिया’चा प्रवास केवळ उद्योगक्षेत्रापुरता मर्यादित न राहता, नव्या पिढीतील उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यातूनही एखादा तरुण उद्योजक झाला, तर या केस स्टडीचा उद्देश साध्य झाल्याचे समाधान मिळेल.”
भरत गीते म्हणाले, “हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये केस स्टडी म्हणून निवड होणे, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आमचा प्रवास मूलभूत तत्त्वांवर आधारित असून, मर्यादांवर मात करत भारतीय उत्पादन जागतिक दर्जाचे बनू शकते, हे सिद्ध करण्याचा आहे. योग्य दृष्टिकोन, शिस्त आणि भागीदारीच्या आधारे भारतासाठी आणि जगासाठी उच्च-गुणवत्तेचे, प्रिसिजन-आधारित अभियांत्रिकी उपाय आणि टिकाऊ उत्पादन मूल्य निर्माण करता येते, हा आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.”
२०१६ मध्ये स्थापना झालेली तौराल इंडिया आज चाकण (पुणे) आणि सुपा (अहिल्यानगर) या दोन उत्पादन प्रकल्पांसह ॲल्युमिनियम कास्टिंग उत्पादक म्हणून विकसित झाली आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दोन गोष्टींशी भावनिक बंध असून, उद्योगांना ग्रामीण भागाकडे घेऊन जाण्याचे ध्येय आहे, असे भरत गीते यांनी यावेळी नमूद केले.
अक्षय तृतीयेला JioFinance चा धमाका! Digital Gold खरेदीवर मिळणार तब्बल ‘इतकं’ सोनं; पाहा काय आहे ऑफर?






