फोटो सौजन्य - Social Media
मुंबई : बहुप्रतिक्षित देऊळ बंद २ या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची प्रचंड लाट उसळली आहे. काही दिवसांपूर्वीच २१ मे २०२६ ही प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता समोर आलेल्या या पोस्टरमुळे चित्रपटाबाबतची चर्चा आणखी रंगली आहे. “आता परीक्षा देवाची” ही टॅगलाईन प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांची मालिकाच उभी करते—या वेळी स्वामींची परीक्षा कोण घेणार? की भक्तांची श्रद्धा कसोटीवर लागणार?
पहिल्या भागात आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या आवाजातील भारदस्तपणा आणि सादरीकरणातील गूढता यामुळे प्रेक्षकांना स्वामी समर्थ प्रत्यक्ष आपल्या समोर उभे असल्याचा अनुभव आला होता. त्यामुळेच “देऊळ बंद २” मध्येही त्यांच्याकडून तितकाच प्रभावी अभिनय पाहायला मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोस्टरमधील दृश्य अत्यंत लक्षवेधी आहे. अभिनेत्री स्नेहल तरडे दुचाकी चालवत असून त्यांच्या मागे स्वामी समर्थ प्रसन्न मुद्रेत बसलेले दिसतात. मात्र या प्रसन्नतेच्या पार्श्वभूमीवर स्नेहल यांच्या चेहऱ्यावर दिसणारा राग आणि डोळ्यांतून ओघळणारे अश्रू ही कथा अधिक गूढ आणि भावनिक असल्याचे सूचित करतात. हा विरोधाभासच चित्रपटाची उत्सुकता वाढवणारा ठरतो. ‘भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात’ हा भाव पोस्टरमधून प्रभावीपणे व्यक्त होतो.
विशेष म्हणजे, पहिल्या भागात स्वामींना आलिशान गाडीतून प्रवास करताना दाखवण्यात आले होते. मात्र या वेळी ते एका सामान्य महिलेच्या दुचाकीवरून प्रवास करताना दिसत आहेत. यामधून दिग्दर्शकांनी समाजातील सामान्य माणसांच्या जीवनातील संघर्ष आणि श्रद्धेची ताकद अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या भागात एका सामान्य कुटुंबाची असामान्य कथा, त्यांचे दुःख, त्यांचा संघर्ष आणि स्वामीकृपेने होणारे परिवर्तन यांचा भावनिक प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचे संकेत मिळतात.
चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले आहेत. त्यांच्या दमदार कथनशैलीमुळे आणि वास्तववादी मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करेल, अशी अपेक्षा आहे. निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली असून वटवृक्ष एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट साकारला गेला आहे.
“देऊळ बंद” या पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. श्रद्धा, अध्यात्म, संघर्ष आणि समाजातील वास्तव यांचा संगम असलेला हा चित्रपट केवळ मनोरंजन न करता प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल, अशी चिन्हे दिसत आहेत. एकूणच, “देऊळ बंद २” च्या पोस्टरनेच चित्रपटाची ताकद दाखवून दिली आहे. आता २१ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर किती मोठी कमाई करतो आणि प्रेक्षकांच्या मनावर किती गारूड करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






