
फोटो सौजन्य - Social Media
शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी ‘राईट टू एज्युकेशन’ (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत संथ गती दिसून येत असून, लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांपैकी मोठ्या संख्येने प्रवेश अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एकूण २३८१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून काढलेल्या सोडतीत ९४४ विद्यार्थ्यांची निवड झाली. मात्र, अंतिम मुदतीपर्यंत केवळ ३८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत.
जिल्ह्यातील ९५ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत १००७ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. १० एप्रिलपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असली, तरी विविध अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित राहिले आहेत. सुरुवातीला १ किमी अंतराची अट अनिवार्य असल्याने अनेक पालकांना अर्ज करता आले नव्हते. त्यानंतर ३ किमीपर्यंतच्या शाळांचा पर्याय देण्यात आला. मात्र, या बदलामुळेही प्रक्रिया सुरळीत झाली नाही. कागदपत्रांची पूर्तता, पडताळणी आणि माहिती मिळण्यात होणारा विलंब यामुळे पालकांची मोठी गैरसोय होत आहे.
याशिवाय, अनेक पालकांना लॉटरी संदर्भातील संदेश मोबाईलवर वेळेत मिळाले नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. काहींना अपेक्षित शाळा न मिळाल्यानेही प्रवेश प्रक्रिया अडकली आहे. परिणामी, लॉटरी लागूनही अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित राहिले आहेत.
या पार्श्वभूमीवर पालकांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने प्रवेश प्रक्रियेसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे उर्वरित ५६२ विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी सांगितले की, कागदपत्रांची अपूर्णता आणि वेळेत पडताळणी न झाल्यामुळे प्रवेशाची संख्या कमी राहिली आहे. आता मुदतवाढ मिळाल्याने पालकांना आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील, तसेच पडताळणी समितीलाही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. त्यामुळे पुढील काही दिवसांत प्रवेश प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.