
HSC Exam 2026: उद्यापासून विद्यार्थ्यांची 'परीक्षा'; वेळ मर्यादा अन् CCTV चे नियम वाचाच, कॉपी केल्यास...
राज्यभरात उद्यापासून बारावीची परिक्षा
कॉपीमुक्त अभियानराबवत कडक कारवाईचा इशारा
राज्यस्तरीय अन् जिल्हास्तरीय दक्षता समित्या कार्यरत
पुणे/सोनजी गाढवे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने आजपासून (१० फेब्रुवारी ते बुधवार दि. १८ मार्च) या कालावधीत राज्यातील बारावीची (HSC) परिक्षा होणार असून, या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थी नोंदणीकृत झाले असून, राज्यभरातील ३ हजार ३६७ केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी २७१ भरारी पथकांसह अन्य काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे.
डॉ. बेडसे म्हणाले, परीक्षार्थींनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेच्या काळात नैराश्य किंवा तणाव जाणवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने समुपदेशन सुविधा उपलब्ध केली आहे. राज्यस्तरावर १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून विभागीय स्तरावरही जिल्हानिहाय समुपदेशक नेमले आहेत. तसेच नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा कार्यरत करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियानांतर्गत विद्यार्थ्यांपर्यंत योग्य संदेश पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा व्यापक वापर करण्यात येत आहे. ३३ हजाराहून अधिक मुख्याध्यापक/प्राचार्यांना ईमेल, एसएमएस आणि व्हॉट्सॲप बल्क मेसेज द्वारे सूचना पाठविण्यात आल्या आहेत. समाजातील मान्यवरांचे व्हिडिओ संदेशही प्रसारित केले जात आहेत.
CBSE च्या विद्यार्थ्यांनो! दहावीची परीक्षा आता दोन वेळा; २०२६ पासून नवा नियम लागू
१७२ परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल
शिक्षण विभागाने परीक्षेसाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही असणे अनिवार्य केले आहे. मात्र, राज्यातील १७२ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नाही. त्यामुळे या केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबद करण्यात आली आहे. राज्य मंडळाने २४८ परीक्षा केंद्रे संवेदनशील असल्याची माहिती बेडसे यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात गुगल मीट, झूमचा वापर
जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात सीसीटीव्ही नसलेल्या काही ठिकाणी गुगल मीट, झूम अशा प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
यावेळी शाखानिहाय विद्यार्थ्यांची संख्या
-विज्ञान – ७ लाख ९९ हजार ६७३
-कला – ३ लाख ८० हजार ६१२
-वाणिज्य – ३ लाख २० हजार १५२
-व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम – २७ हजार ३४८
-टेक्निकल सायन्य – ४ हजार ४९२
-एकूण विद्यार्थी – १५ लाख ३२ हजार ४८७
बारावीच्या विद्यार्थींची मागील आणि आताची आकडेवारी
तपशील – फेब्रुरवारी- मार्च २०२५ – फेब्रुरवारी- मार्च २०२५ – विद्यार्थी संख्येत वाढ
मुले – ८ लाख १० हजार ३४८ – ८ लाख २० हजार २२९ – ९ हजार ८८१
मुली – ६ लाख ९४ हजार ६५२ – ७ लाख १२ हजार २४० – १८ हजार ५८८
ट्रान्सर्जेंडर – ३७ – १८ – १९
एकूण विद्यार्थी संख्या – १५ लाख ५ हजार ३७ – १५ लाख ३२ हजार ४८७ – २७ हजार ४५०
विभागीय मंडळनिहाय विद्यार्थी संख्या
पुणे – २ लाख ६० हजार १४
नागपूर – १ लाख ६० हजार ५३०
छत्रपती संभाजीनगर – १ लाख ९१ हजार ४९३
मुंबई – ३ लाख ५२ हजार ७१८
कोल्हापूर – १ लाख १६ हजार ६११
अमरावती – १ लाख ५६ हजार ९१५
नाशिक – १ लाख ७३ हजार ६५१
लातूर – ९६ हजार ५४२
कोकण – २४ हजार १३
कॉपीमुक्त अभियान; कडक कारवाईचा इशारा
राज्यस्तरीय अन् जिल्हास्तरीय दक्षता समित्या कार्यरत
-परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येतील.
-आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतील.
-ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध आहे तेथे परीक्षेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
-परीक्षेशी संबंधित कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार झाल्यास कारवाई करण्यात येईल.
-महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंध कायदा, १९८२ अंतर्गत गैरप्रकार करणाऱ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.