
फोटो सौजन्य - Social Media
देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी UPSC Civil Services Examination उत्तीर्ण करणे अनेक तरुणांचे स्वप्न असते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, मात्र मोजक्यांनाच यश मिळते. अशाच कठीण स्पर्धेत शेतकऱ्याच्या मुलीने उल्लेखनीय यश मिळवत प्रेरणादायी उदाहरण घडवले आहे. ईश्वर्या रामनाथन यांनी अवघ्या २४ व्या वर्षी आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला.
तामिळनाडूतील कुड्डालोर येथे जन्मलेल्या ईश्वर्याचे वडील शेतकरी असून आई सरकारी नोकरीत आहेत. लहानपणापासूनच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. बालपणात आलेल्या पूर, चक्रीवादळ आणि विशेषतः २००४ च्या त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. याच अनुभवांमुळे समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
ईश्वर्याने २०१७ मध्ये चेन्नईतील अण्णा विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आणि त्याच काळात यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया ६३० वा क्रमांक मिळवत रेल्वे सेवेत स्थान मिळवले. मात्र त्यांनी समाधान न मानता पुन्हा प्रयत्न केला आणि २०१९ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया ४७ वा क्रमांक मिळवत आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. आज त्या तामिळनाडूतील तिरुवल्लूर येथे उपजिल्हाधिकारी (SDM) म्हणून कार्यरत आहेत.
ईश्वर्या यशाचे श्रेय आत्मविश्वास, सातत्य आणि योग्य नियोजनाला देतात. त्यांच्या मते, परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम नीट समजून घेणे आणि त्यानुसार वेळापत्रक तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ अभ्यास नव्हे, तर योग्य रणनीती आणि उत्तर लेखनाचा सरावही तितकाच गरजेचा आहे. त्यांनी उमेदवारांना सल्ला देताना सांगितले की, स्पष्ट ध्येय, प्रभावी योजना आणि नियमित मेहनत यामुळे कोणतीही कठीण परीक्षा जिंकता येते. आज ईश्वर्या रामनाथन यांची यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मर्यादित साधनसामग्री असूनही मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी झटल्यास यश निश्चित मिळते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.