
NEET ची फेरपरीक्षा होणार उद्या; परीक्षा केंद्रांवर असणार खडा पहारा, 35 प्रमुख शहरांमध्ये...
मुंबई : पेपरफुटीच्या घटनांमुळे वादग्रस्त ठरलेल्या ‘नीट’ची फेरपरीक्षा रविवारी होणार आहे. ही परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र सरकारपासून ते राज्य आणि जिल्हा प्रशासनापर्यंत सर्वांनी अत्यंत कडक उपाययोजना राबवल्या आहेत. यंदा परीक्षार्थीची मोठी संख्या लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थेत अभूतपूर्व वाढ करण्यात आली आहे.
परीक्षार्थीच्या नोंदणीत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून सुमारे २ लाख २० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील ३५ प्रमुख शहरांमध्ये परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव एनटीएने थेट शाळा, कॉलेजांची एकूण संख्या अंतिम प्रवेशपत्राद्वारे गोपनीय ठेवली असली, तरी संपूर्ण राज्यातील सर्व प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये उपकेंद्रे सज्ज करण्यात आली आहेत.
पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त
पुणे शहरातील २७ परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी सुमारे २० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सोशल मीडियावरील पेपरफुटीच्या अफवा आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत.
ठाणे जिल्ह्यामधील २१ केंद्रांभोवती निर्बंध
ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील २१ परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात विनाकारण गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. फॅक्स सेवा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुकाने तात्पुरती बंद राहतील. ‘नीट’ परीक्षेमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २१ जून रोजी नियोजित असलेल्या बी.ए. आणि बी. एस्सी. च्या लेखी परीक्षा रद्द करून त्या ११ जुलै रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापुरात विमानाने आणलेल्या प्रश्नपत्रिका शहरात कडक पोलीस बंदोबस्तात एका राष्ट्रीयकृत बँकेच्या मुख्य शाखेत सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
राज्यस्तरीय समान व कडक उपाययोजना
– हवाई दलाची मदत : प्रश्नपत्रिकांची मुख्य केंद्रांपर्यंतची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारने थेट भारतीय हवाई दलाच्या विमानांची मदत घेतली आहे.
– एआय आणि बायोमेट्रिक तपासणी : तोतयागिरी रोखण्यासाठी सर्व एआय आधारित चेहरा ओळख तंत्रज्ञान आणि बायोमेट्रिक हजेरी वापरली जाणार आहे.
– वेशभूषेवर कडक निर्बंध : परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांना दुपट्टा, बुरखा, मास्क आणि टोपी परिधान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
– ओळखपत्र अनिवार्य : प्रवेशासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना किंवा मतदान ओळखपत्र यापैकी एका मूळ छायाचित्र ओळखपत्राची प्रत सोबत ठेवणे बंधनकारक आहे.