
NEET ची फेरपरीक्षा आज; NTA च्या चोख तयारीच्या दाव्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंतही गोंधळ
नवी दिल्ली : पेपरफुटीच्या आरोपानंतर रद्द करण्यात आलेली नीट परीक्षा आज होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) या फेरपरीक्षेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केल्याचा दावा केला आहे. यामध्ये हवाई दलाच्या मदतीने सर्व परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षेत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रांवर सीआरपीएफ तैनात करण्यात आली असून, परीक्षार्थीच्या बायोमेट्रिक ओळखीसोबतच ‘फेस रिकग्निशन’ व्यवस्था करण्यात आली आहे.
सोशल प्लॅटफॉर्मवर कडक नजर ठेवली जात असून, ‘टेलीग्राम’ अॅपवर २२ जूनपर्यंत देशभरात बंदी घालण्यात आली आहे. पेपर रद्द करण्याच्या आदेशापासून ते २१ जून या परीक्षेच्या तारखेपर्यंत घडलेल्या अनेक घडामोडींमुळे विद्यार्थी आधीच मानसिक तणावात आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट फेरपरीक्षेत नागपूरच्या विद्यार्थ्याला अबू धाबीचे केंद्र देण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. ते म्हणाले की, सरकारने मुलांच्या भविष्याशी जुगार खेळणे बंद केले पाहिजे. राहुल यांनी एक्सवर या घटनेचा उल्लेख करत संपूर्ण परीक्षा पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले.
ते म्हणाले, गेल्या महिनाभरापासून परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याला शेवटच्या क्षणी समजते की, त्याचे परीक्षा केंद्र विदेशात आहे. यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली आला, रात्रभर रडत राहिला आणि त्याने परीक्षा देण्यासच नकार दिला. या मानसिक त्रासाची कोणी कल्पना तरी करू शकते का? अखेर असे घडलेच कसे? उद्या कोणत्याही विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहोचू न शकल्याची तक्रार येता कामा नये.
दुपारी दोन वाजता सुरु होणार परीक्षा
नीटची ही परीक्षा २ वाजता सुरू होऊन सायं. ५:१५ वाजता संपणार आहे. यासाठी ५५१ परीक्षा केंद्रे देशभरात देण्यात आली आहेत.
विद्यार्थ्याची आत्महत्या
गाझियाबादमध्ये २२ वर्षांच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या एक दिवस आधी आत्महत्या केली आहे. हे आत्मघातकी पाऊल उचलण्यापूर्वी त्याने १ मिनिट ४ सेकंदाचा एक व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये त्याने आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे म्हटले आहे.
दिल्लीत कॉक्रोच पार्टीची निदर्शने
‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने शनिवारी जंतर-मंतर येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यादरम्यान सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत म्हटले की, जोपर्यंत प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही जंतर-मंतरवरून हटणार नाही.