फोटो सौजन्य - Social Media
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ सुरू केली आहे. या योजनेत राज्यातील गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना रोख पारितोषिक दिले जाणार आहे. ही योजना राज्य, अपर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालय या तीन स्तरांवर राबविली जात आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल स्कूल, सैनिकी शाळा आणि नामांकित शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. राज्य शिक्षण मंडळ व केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांतील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. या योजनेअंतर्गत दहावी आणि बारावी (कला, वाणिज्य, विज्ञान) शाखेतील प्रत्येकी पाच गुणवंत मुला-मुलींना सन्मानित केले जाणार आहे.
गुणवत्तेनुसार प्रथम क्रमांक मिळवणाऱ्याला राज्य स्तरावर ३० हजार, अपर आयुक्त स्तरावर १५ हजार आणि प्रकल्प कार्यालयात १० हजार रुपये मिळतील. द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे २५ हजार, १० हजार व ७ हजार, तर तृतीय क्रमांकासाठी २० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये दिले जातील. चौथा क्रमांक मिळवणाऱ्याला १५ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १० हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेत सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना विभागीय मंडळ नसल्यामुळे वगळण्यात आले आहे.
मात्र, राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतील प्रत्येकी २४ गुणवंत विद्यार्थ्यांना दहा महिन्यांसाठी दरमहा एक हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय, शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील प्रथम क्रमांकाच्या तीन विद्यार्थ्यांना प्रकल्प व अपर आयुक्त स्तरावर गौरविण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे १०० टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळांचा तसेच त्यांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा सुद्धा विशेष सत्कार केला जाणार आहे. ही योजना विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेबाबतची आवड निर्माण करण्यास उपयुक्त ठरणार आहे.