
फोटो सौजन्य - Social Media
देऊळगाव राजा (ता. प्र.) : स्थानिक व्यंकटेश महाविद्यालय येथे मराठी, अर्थशास्त्र आणि वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अतिथी व्याख्यान तसेच राज्यस्तरीय भित्तीपत्रक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अॅड. प्रदीप घेवंदे, अॅड. अर्चना घेवंदे यांची उपस्थिती होती. तसेच श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. प्रमुख वक्ते म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील आकाशवाणी निवेदक धम्मपाल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. यानंतर अॅड. अर्चना घेवंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना महान व्यक्तींच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांनी समाजातील बदलासाठी शिक्षणाचा उपयोग करावा, असे आवाहन केले. दरम्यान, वाणिज्य व अर्थसंगम ‘विचारवंत ते उद्योजक’ या थीमवर आयोजित राज्यस्तरीय भित्तीपत्रक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत निशा मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाची भाग्यश्री सातपुते आणि छत्रपती संभाजीनगर येथील सर सय्यद महाविद्यालयाची उजमा बानू यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळवला. तर श्री व्यंकटेश महाविद्यालयातील जान्हवी तिडके हिने तृतीय क्रमांक मिळवला.
विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी संयोजन समितीला व्यवस्थापन प्रतिनिधी छायाराजे विजयसिंह जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. ज्योती दोकले यांनी केले.
एकंदरीत, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विचारप्रवर्तक विषयांवर आपले मत मांडण्याची संधी मिळाली असून त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळाली आहे.