
गुणवंत
motivation Mhaswad News: म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी अप्पर जिल्हा अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, शालेय जीवनातच गुरूजणांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचा पाया मजबूत करून आयुष्याचं सोनं करावे.
त्या पुढे बोलताना म्हणतात की, ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले आहे, त्यांच्या या यशाची नशा कायम अंगात राहिली पाहिजे. हे यश नेहमी डोक्यात असले पाहिजे तरच भविष्यात विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे सोपे जाते. आपल्याला चांगले गुरूजण लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे.
या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मुलींची संख्या जास्त दिसून येत आहे. परमेश्वराने स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव कधीच केला नसून सर्वांना बुद्धी सारखीच दिलेली असते, त्याचा सर्वांनी चांगल्या प्रकारे वापर करून ध्येय साध्य करावे. मी जेव्हा शालेय शिक्षण घेत होते, तेव्हा चौथी व सातवी इयत्तेत स्कॉलरशिप स्पर्धा होत्या, मी चौथीपासून ते मेडिकल कॉलेजपर्यंत स्कॉलरशिपवर शिक्षण पूर्ण केले याचा मला अभिमान आहे.
आपणही शालेय जीवनापासून स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वावलंबी शिक्षण घेत यूपीएससी, एमपीएससी परीक्षांच्या माध्यमातून आपल्या पायावर उभे राहणे हे ध्येय असणे गरजेचे आहे, नाहीतर मग मुलींची लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडून किंवा मुलांकडून मदत मागण्यापेक्षा, आत्ताच आपल्या गुरुजनांकडून योग्य मार्गदर्शन घेऊन, सोशल मीडियावरचा वेळ कमी करून, कुठेही वाहवत न जाता आपल्या आयुष्याचे सोने करावे असे आवाहन कडुकर यांनी केले.
या कार्यक्रमांमध्ये क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी विद्यालय तसेच मेरी माता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतिवीर नागनाथ यांना विद्यालयाचे शिक्षक अभिजीत सावंत यांनी केले तर आभार सपोनि संदीप पोमन यांनी मानले. यावेळी डी.वाय.एस.पी रणजीत सावंत, सपोनि संदीप पोमण, क्रांतिवीर नागनाथ अण्णा विद्यालयाच्या सचिव सौ. सुलोचना विश्वंभर बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.