
जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
पुणे : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकने आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यानंतर चार वाहनांचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्यरात्री हा भीषण अपघात जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ लक्ष्मी लॉजसमोर रविवारी (१३ सप्टेंबर) झाला आहे. या अपघातात हृदयनाथ मोहन गायकवाड (वय ४७) आणि आनंदीबाई रामचंद्र वाडकर (वय ५०) यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
अपघातात १२ जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, १२५ (अ), (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १७७/११९ आणि १३४ (अ), (ब) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ट्रकचालक प्रमोद वाघ तसेच ट्रकचे मालक संदीप गोरख सूर्यवंशी (वय ४५, रा. खटाव, जि. सातारा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने ट्रक येत होता. जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्या ट्रकने पुढील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही ट्रक मुंबईकडे जाणारी मार्गिका सोडून मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या बाजूच्या मार्गिकेत गेले. त्यावेळी तेथून जाणाऱ्या दोन कारवर ट्रक आदळले. या चार वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात चारही वाहनांतील चालक आणि प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना हृदयनाथ मोहन गायकवाड यांचा आणि आनंदीबाई रामचंद्र वाडकर यांचा मृत्यू झाला. गायकवाड हे मेघवाडी पोलिस ठाण्याजवळ, जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथे राहत होते. वाडकर या सेक्टर नेरूळ, नवी मुंबई येथे राहत होत्या. अपघातातील १२ जखमींवर भारती हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, सिल्वर बर्च हॉस्पिटल आणि श्रेयस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली.