
मोठी बातमी ! सुपे घाटात विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस उलटली; 4 विद्यार्थी जखमी
बारामती : बारामती तालुक्यातील सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला बुधवारी (दि. १६) सकाळी अपघात झाला. विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस घाटातील पहिल्या वळणावर नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. या बसमध्ये सुमारे ६० ते ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करत होते. अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पाटस मार्गावरून कुसेगाव, पडवी तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन एस. टी महामंडळाची बस सुप्याच्या दिशेने निघाली होती. सकाळी साडेसातच्या सुमारास सुपे घाटातील पहिल्या वळणावर बस चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बस दोन पलट्या घेत रस्त्याच्या बाजूला खाली गेली. या ठिकाणी रस्त्यालगत संरक्षक कठडा नसल्याने अपघाताची तीव्रता वाढली , यात बस पलटी झाली.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती शाळेचे योगेश पाटील यांनी दिली.
शालेय वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बसची नियमित तांत्रिक तपासणी केली जाते का, बसचे ब्रेक, टायर, इंजिन आणि अन्य यंत्रणा सुस्थितीत आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.
यंत्रणांकडून घटनेची चौकशी करावी
विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बससाठी दररोजचा सुरक्षा तपासणी अहवाल ठेवण्यात यावा, अशीही मागणी पुढे आली आहे. त्याचबरोबर सुपे घाटातील अपघातप्रवण वळणावर संरक्षक कठडा आणि अन्य आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारण्याची मागणी पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना बसला झालेल्या अपघातामुळे शालेय वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांकडून या घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
युगेंद्र पवार यांची घटनास्थळी भेट
या अपघाताची माहिती मिळताच विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस अधिकाऱ्यांकडून अपघाताची माहिती घेतली. जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांशी देखील त्यांनी चर्चा केली.